अतिरिक्त ऊस : दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखाने सुरू करण्याचे नियोजन

पुणे : अतिरिक्त उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी साखर कारखाने कामाला लागले आहेत . दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजे पाच ऑक्टोबरला कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूर विभाग वगळता, मागील गळीत हंगामात विशेषकरून मराठवाडय़ात गळीत हंगाम १३ जूनपर्यंत सुरू होता. उन्हाळय़ाच्या दिवसांत ऊसतोडणी मजुरांची मोठी टंचाई, घटणारा साखर उतारा आणि कारखाने पूर्ण क्षमतेने न चालल्यामुळे यंदा कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठय़ा प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे मराठवाडय़ातील कारखानदार दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांचे बॉयलर पेटवून गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
‘‘यंदाचा गळीत हंगाम काहीही करून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू करावाच लागणार आहे. पण, ऊसतोडणी मजूर दसरा झाल्याशिवाय कामावर येणार नाहीत. ते कामावर येताच हंगाम सुरू करणार आहोत.’’ असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.