आदिनाथ कारखाना चालवण्यावर रोहित पवार ठाम

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव मंजूर केला आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतली होती, परंतु आता शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी कारखान्यात वेगवेगळ्या नावाने समित्या स्थापन करून राजकारण सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.
करमाळ्याचा श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार.
तशी कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे – आमदार रोहित पवार.
‘बारामती ऍग्रोला हा कारखाना भाडेतत्वावर देऊ नये, असा ठराव केलेल्या सभासदांचा विरोध निष्प्रभ ठरण्याची चिन्हे.
सोलापूर: करमाळ्याचा श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा नियमानुसार ‘बारामती ॲग्रो कंपनी’कडूनच चालवला जाणार आहे. तशी कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे ‘बारामती ऍग्रोला हा कारखाना भाडेतत्वावर देऊ नये, असा ठराव केलेल्या सभासदांचा विरोध निष्प्रभ ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (MLA Rohit Pawar is adamant about running Adinath Sugar Factory)
साखर कारखानदारीत कळीचा मुद्दा ठरलेला आदिनाथ कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीला देऊ नये याबाबत ऑनलाईन सर्वसाधारण सभेत असा ठराव बहुमताने मंजूर झाला खरा, पण आता बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी प्रसिद्धीसाठी व्हॉट्सपच्या माध्यमातून पत्रक दिले आहे. चुकीच्या आणि गैर व्यवस्थापनामुळे आदिनाथ कारखाना कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने तो जप्त करुन टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात सर्वांत जास्त भाडे देऊ केलेल्या ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला हा कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालवायला दिलाय.
दरम्यान, या कारखान्यावर ‘एनसीडीसी’ बँकेकडून पाच वर्षांपूर्वी घेतलेले २५ कोटी कर्ज आता ५० कोटी रुपये झाले आहे. त्यांच्या कर्जाच्या परतफेडीबाबत कायदेशीर मार्ग निघाल्यानंतर कारखाना चालवण्यासाठी त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे.याबाबतच्या प्रक्रीयेमध्येच सुमारे दोन वर्षे गेली आहेत.त्यामुळे तांत्रिक गोष्टी समजत नाहीत म्हणून सभासदांत गैरसमज पसरविला जात असल्याचे गुळवे यांनी म्हंटलंय.
नियमानुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून ‘बारामती ॲग्रो कंपनी’ला चालवावयास मिळाला तेव्हा संचालक मंडळाने तसा ठराव मंजूर केला आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यताही घेतली होती, परंतु आता शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी कारखान्यात वेगवेगळ्या नावाने समित्या स्थापन करून राजकारण सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.
कारखाना भाडेतत्वावर घेतल्यानंतरही तो सुरू न करणे हे कोणत्याही कंपनीच्या आर्थिक धोरणात बसत नसते. बारामती ऍग्रो कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी कंपनी आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्यामागील मूलभूत कारण लक्षात घेतले पाहिजे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कांही मंडळी सभासदांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत.हा कारखाना सुरू न होण्यात स्थानिक नेते मंडळींचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. या स्वार्थापायीच जाणीवपूर्वक कायदेशीर किंवा सभासदांच्या आडून अडथळे आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. परंतु कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू होणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
‘बारामती ॲग्रो कंपनी’ व करमाळा तालुका यांचे २००७ पासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. करमाळ्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या साडेचार लाख टन ऊसाचे तर गेल्या वर्षीही ३ ते साडेतीन लाख टन उसाचे गाळप केले आणि चांगल्या भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिवाय ‘एनसीडीसी’ बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात उशीर होत असल्याचे दिसू लागल्याने केवळ करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये या हेतूने शेटफळ गडे येथील ‘बारामती ॲग्रो’च्या युनिट १ चा विस्तार करुन गाळप क्षमता वाढविण्यात आली. त्याचा फायदा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आणि नोंद केलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहिला नाही. तसेच गाळप क्षमता वाढीमुळे दरवर्षीपेक्षा दिड ते दोन लाख टन जास्त ऊस गाळप करता येत आहे.