साखर कारखान्यांची ४० कोटींची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर आयुक्तालयाकडून कार्यवाही सुरू

पुणे : गेल्या सुमारे दीड दशकामध्ये 81 साखर कारखान्यांची विविध घटकाकडून 39 कोटी 46 लाख 84 हजार 322 रुपयांची फसवणूक झाली. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

साखर आयुक्त शेखर गायकवाड

साखर कारखान्यांची वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून ‘महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार’ अ‍ॅपद्वारे गेली दोन वर्षे माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यातून फसवणुकीच्या घटना समोर आल्या, असे आयुक्तानी स्पष्ट केले.

अ‍ॅपमुळे एकूणच ऊस तोडणीच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. राज्यात एकाच वेळी कार्यरत 200 साखर कारखाने वेगवेगळ्या भागातील ऊस गाळप करतात . प्रत्येक हंगामापूर्वी साखर कारखाने वाहतूकदारांबरोबर करार करीत असतात. अन्य कारखान्यांमध्येसुद्धा तेच वाहतूकदार, मुकादम, ऊसतोडणी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेऊन व रक्कम बुडवून कारखान्यांची फसवणूक होत असल्याचे कारखान्यांच्या संकलित माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यात 10 लाखांच्या आसपास ऊसतोडणी कामगार, 55 हजार वाहन मालक आणि 50 ते 55 हजार मुकादम कार्यरत आहेत. त्यामध्ये 2021-22 करिताच्या नोंदीत माहिती पाहता 38 हजार 967 वाहनधारक, 2 हजार 40 मुकादम यांनी माहिती भरली आहे.

4 हजार 153 लोकांनी अ‍ॅपचा वापर केला असून, ही संख्या चालूवर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी ऊस तोडणीसाठी साखर कारखाने मुकादम आणि ऊस तोडणी टोळी प्रमुखांना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल रक्कम देतात. प्रत्यक्षात रक्कम घेऊनही तोडणीस टोळ्यांचा पुरवठा न होण्यामुळे कारखाने पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल करीत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

साखर सह संचालक (विकास) पांडुरंग शेळके म्हणाले, ‘गतवर्षीच्या 2021-22 च्या हंगामात आगाऊ रक्कम देऊन करार केला आणि प्रत्यक्षात संबंधित मुकादमांनी दुसर्‍या कारखान्यांबरोबरही करार केल्याचे स्पष्ट दिसून आले. असे 250 ते 300 कामगार आढळून आले. अ‍ॅपमध्ये सर्वच कारखान्यांनी माहिती भरल्यास कारखान्यांची होणारी संभाव्य फसवणूक टाळता येणे शक्य आहे.’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »