महायुती लढविणार थोरात कारखान्याची निवडणूक; सत्ता परिवर्तन पॅनलची घोषणा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संगमनेर : थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्यासाठी विरोधकांकडून सत्तापरिवर्तन पॅनलची घोषणा केली आहे. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यानिमित्ताने आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यात ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोमवारी सकाळी शहरातील नवीन नगर रोड येथील डॉ. अशोकराव इथापे यांच्या कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी सविस्तर चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सत्ता परिवर्तन पॅनलची घोषणा करण्यात आली.

 “साखर कारखान्याचे मालक सामान्य सभासद असून हा कारखाना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. संगमनेर साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. मात्र, काही जणांनी त्याला प्रायव्हेट लिमिटेड करून ठेवल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार आहे,” अशी घोषणा आ. खताळ यांनी या बैठकीत केली.

थोरात सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंडळाचे अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन झाल्यानंतर साखर कारखान्याच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते.

साखर कारखान्याच्या सभासदांपैकी मयत सभासदांची संख्या ३ हजाराच्या पुढे आहे. निवडणूकीदरम्यान मयत सभासदांच्या नावाकडे लक्ष ठेवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.  यावेळी वसंतराव गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यात आल्याने साखर कारखाना निवडणूक ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यात रंगतदार होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

बैठकीस आ. अमोल खताळ, ज्येष्ठ नेते व साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक वसंतराव गुंजाळ, संतोष रोहम, दादापाटील गुंजाळ, डॉ. अशोक इथापे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »