१४५ साखर कारखाने ठरले शंभर नंबरी

एफआरपीची सर्व रक्कम जमा, ६२ कारखान्यांकडे ७०२ कोटी थकबाकी
पुणे : यंदाच्या गाळप हंगामात कार्यान्वित राहिलेल्या 207 साखर कारखान्यांपैकी 145 साखर कारखाने ‘शंभर नंबरी’ ठरले आहेत. त्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 62 साखर कारखान्यांकडे ७०२ कोटींची ही रक्कम थकीत आहे.
यातील दोन साखर कारखान्यांवर राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात 2023-24 च्या ऊस गाळप हंगामात एकूण 1075 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यासाठी वाहतूक आणि तोडणी खर्चासहित 33 हजार 947 कोटी रूपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. त्यातील 33 हजार 245 कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. हे प्रमाण एकूण एफआरपीच्या 97.93 टक्के आहे. तर 702 कोटी रूपये एफआरपीची रक्कम थकीत आहे.
यंदाच्या हंगामात 103 सहकारी आणि 104 खासगी अशा 207 साखर कारखान्यांनी गाळप घेतले. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेला हंगाम 14 मे रोजी संपला. यंदा मान्सूनच्या पावसामध्ये सातत्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आणि इतर भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून गाळप हंगाम फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये संपेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही घटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण नोव्हेंबर अखेर झालेल्या अवकाळी पावसामुळे उसाला फायदा झाला असून, राज्यात यंदा गेल्यावर्षीहून अधिक साखर उत्पादन झाले आहे.
यंदाच्या हंगामात निर्यात बंदी व इथेनॉल प्रकल्पांना साखर वळविण्यास आणलेले निर्बंध यामुळे साखर कारखान्यांना एफआरपी देण्यास मोठ्या अडचणी येतील, अशी शक्यता होती. त्यातच साखर निर्यात नसल्याने याचा फटका राज्यातील साखर कारखान्यांना बसला. यामुळे परदेशात दर असूनही या साखर विक्रीतून जादाची रक्कम कारखान्यांना मिळू शकली नाही. याचा फटका आर्थिक दृष्ट्या कुमकुमवत असणाऱ्या कारखान्यांना बसला. हेच कारखाने सध्या एफआरपी देण्यात पिछाडीवर आहेत.