विचित्र चोरी! ३५ टन ऊस तोडून पळवण्याचा प्रयत्न

सांगली: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे एका शेतातून तब्बल ३५ टन ऊस चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरी उघडकीस येईल, या भीतीने संशयिताने तोडलेला संपूर्ण ऊस पुन्हा त्याच शेतात आणून टाकला आहे. कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील रहिवासी लता विजय निटवे यांची कसबे डिग्रज येथे शेती आहे. त्यांच्या शेतातील ३५ टन ऊस अज्ञात मजुरांच्या साहाय्याने तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही बाब उघडकीस येताच संशयित वर्धमान जयपाल अवधूत (रा. कसबे डिग्रज) याने चोरलेला ऊस पुन्हा निटवे यांच्याच शेतात आणून टाकला. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान:
जरी ऊस परत मिळाला असला, तरी तो तोडलेल्या अवस्थेत शेतात पडून राहिल्याने वाळून खराब झाला आहे. यामुळे लता निटवे यांचे सुमारे १ लाख १९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नाहक नुकसान झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
पोलीस कारवाई:
लता निटवे यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित वर्धमान अवधूत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वैयक्तिक वादातून किंवा ऊस गाळपाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.





