‘टोकाई’ वर ॲड. जाधवांचेच वर्चस्व

हिंगोली: वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते अॅड. शिवाजी जाधव यांनी कारखान्यावर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या पॅनेलला १६, तर विरोधी पॅनेलला केवळ एक जागा मिळाली.

कारखाना कोण चालवू शकतो, कोण थकीत रक्कम देऊ शकतो, हे सभासदांना कळले आहे. त्यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. लवकरच एफआरपीची रक्कम दिली जाईल, अशी ग्वाही अॅड. शिवाजी जाधव यांनी विजयानंतर दिली.
अॅड. शिवाजी जाधव यांच्या शेतकरी विकास पॅनेलच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरेगट) यांनी टोकाई शेतकरी विकास पॅनेल उभे केले होते. काँग्रेसने सहा जागांवर उमेदवार उभे केले होते.
निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या १३ कोटींच्या एफआरपीचा मुद्दा कळीचा ठरला होता. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार राजेश नवघरे यांच्यासह भाजपाच्याच काही पदाधिकाऱ्यांनी अॅड. जाधव यांच्या पॅनेलच्या विरोधात प्रचार केला. तर अॅड. जाधव यांनी एकहाती किल्ला लढविला होता.
रविवारी मतदान झाले. यामध्ये ५२६८ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान केले. मंगळवारी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू केली. यामध्ये सर्वात पहिला निकाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा जाहीर झाला. यामध्ये टोकाई शेतकरी विकास पॅनेलचे खोब्राजी नरवाडे विजयी झाले. मात्र त्यानंतर सर्व १६ जागांवर अॅड. शिवाजी जाधव शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाले
अॅड. शिवाजी जाधव, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, शिवाजी इंगोले, मनोज कन्नेवार, रावसाहेब कन्हाळे, विलास नादरे, सुनील बागल, शिवाजी सवंडकर, जगदेवराव साळुंके, गजानन जाधव, साहेबराव पतंगे, विट्ठल भोसले, रणधीर तेलगोटे, बायनाबाई कन्हाळे, अर्चना सिध्देवार, देवानंद नरवाडे, विश्वनाथ जमरे हे विजयी झाले.