उसासाठी AI : हेक्टरी १६ हजार रु. अनुदान देणार : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : उसाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात ‘एआय’ तंत्रज्ञान बसविण्यात येणार आहे. त्याचा हेक्टरी खर्च २५ हजार आहे. यापैकी ९ हजार २५० रक्कम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, तर साखर कारखान्यांनी हजार ७५० अशी एकूण १६ हजार रुपयांच्या रकमेची मदत शेतकऱ्यांना करण्यात येईल, असे जाहीर करताना ‘शेतकऱ्यांनी उर्वरित ९ हजारांचा वाटा उचलालावा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे सोमवारी आयोजित चर्चासत्रावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्तम ऊस उत्पादन काढले आहे. हे तंत्रज्ञान एकदा बसवले की ते पाच ते सात वर्षे चालते. परंतु, त्याचा वार्षिक खर्च शेतकऱ्यांना दरवर्षी करावा लागणार आहे. तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि ‘व्हीएसआय’ यांच्यात नुकताच करार झाला आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व शेतकऱ्यांकडे ठिबक हवे, असेही ते म्हणाले. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, ॲग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित “ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावरील चर्चासत्र वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यानिमित्तानं कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित माहिती पुस्तिकेचं (कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती) विमोचन करण्यात आलं.

दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, २०२३-२४ मध्ये आपल्याकडे देशात ५७ लाख ४० हजार हेक्टर हे उसाचं क्षेत्र लागवडीचं होतं आणि २०२४–२५ मध्ये ते ५३ लाख ५८ हजार हेक्टरपर्यंत खाली घसरलं. म्हणजे ६.६५ % हे क्षेत्र घसरलेलं आहे. देशामध्ये २०२३-२४ ला ३१५८ लाख मेट्रिक टन क्रशिंग झालं आणि २०२४–२५ मध्ये २८०८ मेट्रिक टन क्रशिंग झालं. म्हणजे देशात २०२३-२४ च्या तुलनेत क्रशिंगमध्ये ११% ची घट झालेली आहे. याचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. साखर कारखानदारीला, ऊस उत्पादक शेतकऱ्याला बसलेला आहे .

रिकव्हरीच्या बाबतीत २०२३-२४ मध्ये देशाची रिकव्हरी ही १०.१० होती. आर्थिक समस्यांचा विचार करता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला पाहिजे. नवीन आव्हानं आपण स्वीकारली पाहिजे. कारखानदारी तर टिकली पाहिजे, पिढ्यानं-पिढ्या माझ्या ऊस उत्पादन शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. शेतकरी बांधवांना, सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखान्यांना जी मदत करता येईल, ती मदत आमच्याकडून केली जाईल. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवूया.

आपल्या राज्यातली सहकारी साखर कारखानदारी टिकण्याकरता, शेतकरी बांधवांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरता खाजगी किंवा सहकारी साखर कारखान्यांनी AI चा वापर करण्यास सुरुवात करावी, असं आवाहन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »