फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

साखर कारखान्यांचे लग्न नफ्याशी झाले आहे, त्याचप्रमाणे ते शेती आणि शेतकऱ्यांशी झाले आहे. ऊस उत्पादकांसह सर्व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साखर उद्योगाने बाळगावे, असा सल्लाही शहा यांनी दिला.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकारी साखर उद्योगातील २१ कारखान्यांना उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्काराने (२०२२-२३) सन्मानित करण्यात आले. मात्र त्यातील तीनच पुरस्कार शहा यांनी स्वत: दिले आणि ते त्यांचे भाषण आटोपून निघून गेले. त्यांच्या कार्यमग्नतेमुळे ते अधिक वेळ थांबू शकत नाहीत, असे संयोजनकांनी स्पष्ट केले. १५ जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सहकारमंत्री शहा यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

AMIT SHAH AT NFCSF DELHI FUNCTION

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पॉल, उत्तर प्रदेशचे ऊस विकासमंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, गुजरातचे माजी मंत्री ईश्वर पटेल, महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. देशातील सुमारे सव्वा दोनशे सहकारी साखर कारखान्यांमधून सर्वाधिक दहा पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाल्याने राज्यातील प्रतिनिधींची सर्वाधिक उपस्थिती सभागृहात होती. साखर कारखान्यांचे चेअरमन आणि इन्य अधिकाऱ्यांनी खास महाराष्ट्रीय पेहरावात हजेरी लावल्याने वातावरण बहरून गेले होते.

राष्ट्रीय पातळीवरील उच्च उतारा विभागातील अतिउत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला, तर दुसरा पुरस्कार तमिळनाडूच्या डी. एस. सुब्रमणिया शिवा कोऑप साखर कारखान्याला आणि सवोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार आंबेगाव येथील श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

‘डिमांड’ करण्यापेक्षा ‘डायनामिक व्हा’
शहा म्हणाले, ‘राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील माझ्याकडे विविध मागण्यांचा नेहमीच पाठपुरावा करत असतात. आम्ही आयकर माफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु फेडरेशनला ‘डिमांड ड्रिव्हन’ (मागणीदार) करण्यापेक्षा ‘डायनॅमिक’ करा. त्यादृष्टीने विचार करा. मात्र तरीही आमच्यासमोर योग्य मागण्या घेऊन या. आम्ही त्यावर विचार करू. निश्चितपणे बोल्ड निर्णय घेऊ.’

भविष्यात मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची गरज लागणार आहे. त्यादृष्टीने साखर कारखान्यांनी तयारी करावी. केवळ ऊस पिकावर अवलंबून न राहता, अन्य पर्यायांची विचार करावा. कारण केवळ ऊस पिकापासून आपण मागणीएवढा इथेनॉल पुरवठा करू शकणार नाही. त्यामुळे मका, अन्य खराब धान्ये, बांबू, गव्हाचे तूस इत्यादी मुबलक फीडस्टॉक आपणास शेतीपासून मिळतात. डिस्टिलरी उभी करताना, उसासोबतच इतर फीडस्टॉकपासूनही इथेनॉल तयार करता येऊ शकतो हे लक्षात ठेवूनच बहुपर्यायी डिस्टिलरी उभी करावी, असा सल्ला देताना ‘त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच इतर शेतकऱ्यांचाही फायदा होईल. साखर उद्योगाचे लग्न नफ्याशी आणि तद्वतच शेती – शेतकऱ्यांशी झाले आहे, हे विसरू नका, असे अमित शहा म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी जी २० समूहाच्या परिषदेत बायोफ्यूएल अलायन्स स्थापण्याची घोषणा केली आणि त्याचे मुख्यालय भारतातच म्हणजे गुरगाव येथे सुरू करण्यात आले आहे. बायेफ्यूएलमध्ये अमर्याद संधी आहेत. तुमचा जेवढा काही इथेनॉल तयार होईल तो जगभरात निर्यात करण्याची सोय या अलायन्समुळे उपलब्ध झाली आहे; मात्र त्यासाठी दोन वर्षे थांबावे लागेल, असेही ते म्हणाले.


(सविस्तर भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकला टिचकी मारा)
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या कार्यक्रमात सहकारमंत्र्यांचे मार्गदर्शन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »