नॅचरल शुगर उभारणार देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्धीचा वसा घेतलेले धडाडीचे उद्योजक श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून २००० साली नॅचरल उद्योग समूह उभा राहिला. तो आज रौप्यमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे, तर संस्थापक श्री. ठोंबरे २४ एप्रिल रोजी सत्तरीचा उंबरठा पार करत आहेत. यानिमित्त ‘शुगरटुडे’ मासिकाने त्यांच्याशी साधलेला हा संवाद… साखर कारखानदारीसमोरील आव्हाने, उपाय, भविष्याचा वेध, ग्रामीण विकासाची दिशा आदी मुद्यांवर ते मनापासून बोलले…

ग्रामीण भागातील २८ हजार कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणणारा नॅचरल उद्योग समूह म्हणजेच नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. विविधांगी उद्यमशीलता आणि लोककेंद्री योजनांसाठी अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. वैश्विक साखर उद्योगाच्या नकाशावर ‘नॅचरल’ला अत्यंत सन्मानाचे स्थान तर आहे, शिवाय सामाजिक उत्तरदायित्व कटाक्षाने जपणारा उद्योग समूह म्हणूनदेखील त्याची ओळख आहे. या उद्योगाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. बी. ठोंबरे हे खरे तर पालकच. ‘नॅचरल’वर ते पोटच्या मुलापेक्षाही अधिक प्रेम करतात.

त्यांना सहजच विचारलं, आपले अन्य छंद काय? ते म्हणाले,‘नॅचरल हाच माझा छंद आहे, तेच माझे प्रेम आहे, काम ही तेच आहे आणि विरंगुळादेखील तेच आहे…’
‘‘मी एकदा खूप आजारी पडलो, हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. पोटाचे ऑपरेशन झाले. तेव्हा वेगाने प्रकृती सुधारायची असेल तर मला नॅचरलच्या साइटवर नेऊन ठेवा असे मी डॉक्टर आणि इतर सर्वांना सुचवले….’’
केवढं हे समर्पण आणि तेच नॅचरल उद्योग समूहाच्या यशाचे गमक असावं. ठोंबरे यांनी साखरेनंतर दुग्ध व्यवसायात पाऊल टाकलं आणि डेअरी उद्योगदेखील यशस्वी केला. साखरेप्रमाणेच येथेही यशाचे नवे मानदंड निर्माण केले. दूध पुरवणारे आणि त्यात टाकण्यासाठी ‘साखर’सुद्धा देऊन सर्वसामान्यांचे जीवन ‘गोड’ करणारे ठोंबरे यांच्यासारखे उद्योजक विराळच! विविध मुद्यावर ते मनमोकळेपणाने बोलतात.


प्रश्न : साखर उद्योगासमोर सध्या कोणती आव्हाने आहेत आणि त्यांचा सामना कसा करता येईल?
श्री. ठोंबरे : मागची तीन-चार वर्षे साखर उद्योगाला बऱ्यापैकी गेली. मात्र यंदा नैसर्गिक समस्यांसोबतच सरकारच्या धोरणांमुळे सध्या साखर उद्योग अडचणीतूनच जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांत इथेनॉलचा विषय ‘गेमचेंजर’ ठरला होता. परंतु यंदा केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंधने घातली. साखर उत्पादन कमी होईल आणि पुरवठा कमी झाल्यास जनतेचा रोष वाढेल, ते निवडणूक वर्षाच्या काळात परवडणारे नाही, अशी सरकारला भीती होती. पण ही भीती अनाठायी ठरली.

२८० लाख टन साखर उत्पादन होईल, असा सरकारचा कयास होता. मात्र प्रत्यक्षात एप्रिलच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ३२० लाख टन झाले आहे आणि काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ते हंगाम पूर्ण होईल तेव्हा ३६० लाख टनांपर्यंत जाईल. म्हणजे भारतात मुबलक साखर साठा राहणार आहे. असे असताना निर्यातबंदी उठवण्यात आली नाहीच, उलट इथेनॉल उत्पादनावर बंधन लादण्यात आली. त्यात साखरेचे दर तुलनेने खूप कमी वाढले. त्यामुळे साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले.

साखर उद्योग हा एकमेव असा उद्योग आहे, ज्यात कच्च्या मालाचा दर सरकारच ठरवतं, पक्क्या मालाचा दरही सरकारच ठरवतं. असे का तर साखरेला कायद्याने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे हा उद्योग संपूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. अशा अनेक अडचणी असताना भारतीय साखर उद्योगाने देशाचे नाव संपूर्ण जगात उंचीवर नेले आहे. आज आपल्या साखरेचा जगभर दबदबा आहे.


(सविस्तर मुलाखत ‘शुगरटुडे’च्या एप्रिल २०२४ च्या अंकात)

(अंकाच्या मागणीसाठी ८९९९७७६७२१ वर व्हॉट्‌सअप संदेश करा)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »