‘भोगावती’त सत्तारूढ आघाडीचा एकतर्फी विजय
कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश मिळाले. आघाडीचे २५ पैकी २४ उमेदवार सुमारे अडीच हजारांच्या फरकाने निवडून आले. आमदार पी. एन. पाटील यांनी कारखाना पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवला.
भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार पी. एन. पाटील यांना शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी साथ केली.
त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीने तसेच माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, भाजपचे हंबीरराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील यांच्या परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये वाढलेला टक्का अखेर पी. एन. पाटील यांच्या बाजूचा कौल देणारा ठरला. या निवडणुकीत तीन पॅनल होऊन मतविभागणी झाल्याचा फायदा सत्तारूढ गटाला झाला. माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील व सदाशिव चरापले यांनी एकत्रित येऊन एकच पॅनल करून आव्हान दिले असते तर सत्तांतर झाले असते, असे आकडेवारीवरून दिसते.
गेल्या ३५ वर्षांच्या सत्तेमध्ये केवळ एक पंचवार्षिक वगळता सलगपणे आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यावर सत्ता आहे. यावेळीही त्यांचा वट कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पहिल्यापासूनच माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली होती. स्वबळावर आघाडी बनवून नवीन चेहरे घेऊन सभासदांसमोर गेलेल्या पाटील यांनी चांगलीच टक्कर दिली. मात्र ते एकटेच विजयी झाले. तिसऱ्या आघाडीचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील, नामदेवराव पाटील, जनार्दन पाटील यांनाही अपयशाला सामोरे जावे लागले.
सत्तारूढ आघाडीला विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा पराभवाने छोटा धक्का बसलाच. संस्था गटाच्या शेवटच्या मतमोजणीमध्ये ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान झाले असताना फक्त पाटील यांना मतदारांनी एकटे पाडल्याचे दिसून आले.
विजयी उमेदवार असे :
कौलव गट : राजाराम शंकर कवडे, धीरज विजयसिंह डोंगळे, धैर्यशील आनंदराव पाटील.- राशिवडे गट : मानसिंग विष्णूपंत पाटील, अविनाश तुकाराम पाटील, कृष्णराव शंकरराव पाटील, प्रा. आनंदा धोंडिराम चौगले
- कसबा तारळे गट : अभिजित आनंदराव पाटील, रवींद्र दत्तात्रय पाटील, दत्तात्रय हणमा पाटील
- करवीर तालुका – कुरुकली गट : शिवाजी पांडुरंग कारंडे, धोंडिराम ईश्वरा पाटील, केरबा भाऊ पाटील, पांडुरंग शंकर पाटील
- सडोली खालसा गट : रघुनाथ विठ्ठल जाधव, अक्षय अशोकराव पवार-पाटील, भीमराव अमृता पाटील, प्रा. शिवाजी आनंदराव पाटील
- हसूर दुमाला गट : प्रा. सुनील आनंदराव खराडे व सरदार चिल्लापा पाटील
- महिला राखीव – सीमा मारुती जाधव व रंजना दिनकर पाटील
- अनुसूचित जाती – दौलू कांबळे. इतर मागासवर्ग – हिंदुराव चौगले
- भटक्या विमुक्त जाती – तानाजी काटकर
निवडणुकीत सत्तारूढ आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केलेल्या माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांच्या नेतृत्वाखालील ‘कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीचे नेते धैर्यशील पाटील हे जाईंट किलर ठरले; पण त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आले. सोमवारी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. विजयानंतर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष केला. गावोगावी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी झाली.
‘भोगावती’च्या २५ जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात हाेते. रविवारी अत्यंत चुरशीने २७ हजार ५६२ पैकी २३ हजार ७९३ (८६.३३ टक्के) मतदान झाले. सोमवारी सकाळ आठपासून कोल्हापुरातील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. मत नोंदविण्यावरून गोंधळ उडाल्याने प्रक्रिया थांबली होती, मात्र मोजणी कर्मचारी बदलल्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली. कौलव गटापासून मोजणीला सुरुवात झाली. येथे शाहू शेतकरी आघाडीचे २४ उमेदवार सरासरी ३५०च्या मताधिक्याने पुढे होते. उदयसिंह पाटील-कौलवकर हे मागे पडत गेले आणि धैर्यशील पाटील हे एकटेच २५ जणांत घुसले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील धायगुडे, प्रेमदास राठोड, मिलिंद ओतारी यांनी काम पाहिले.
कौलवकर चुलत्या-पुतण्यात शेवटपर्यंत चुरस
या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे अध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, मागील पाच वर्षांतील कारभारातून त्यांच्याबद्दल सत्तारूढ गटातच प्रचंड नाराजी होती. त्यामुळे त्यांना टार्गेट करून राधानगरी तालुक्यातूनच वगळण्यात आले. करवीर तालुक्यातून सत्तारूढ गटाला पॅनल टू पॅनल मतदान झाल्याने राधानगरीतील भरपाई करवीरमध्ये होऊन ते विजयी होतील, असा होरा होता. परंतु ,तसे घडले नाही. राधानगरी तालुक्याने त्यांना वगळून कारखान्याच्या संस्थापकांचे नातू म्हणून धैर्यशील पाटील यांना संधी दिली. चुलत्या-पुतण्यातील चुरस शेवटपर्यंत राहिली.