‘एफआरपी’साठी रिकव्हरी निकष कमी करा, ‘सीएसीपी’ बैठकीत मागणी

कृषी मूल्य आयोगाच्या (‘सीएसीपी’) बैठकीतील काही प्रमुख मुद्दे
- शेती अवजारांवरील जीएसटी सरसकट ५ टक्के करा
- ऊस लागत खर्च कमी करण्यासाठी आंतरपिके घ्या
- दहा वर्षांपूर्वीचे हेक्टरी उत्पादन आजही तेवढेच
- कारखाने, केन बोर्ड, शेतकरी, अधिकाऱ्यांची उपस्थिती
पुणे : ‘एफआरपी’ काढताना पूर्वी रिकव्हरीचा निकष साडेआठ टक्के होता, आता तो साडेदहा टक्क्यांवर गेला आहे, अशी चिंता व्यक्त करून, हा निकष घटवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कृषी मूल्य आयोगाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
आयोगाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी साखर संकुलामध्ये झाली. बैठकीला आयोगाचे अध्यक्ष प्रो. विजय पॉल शर्मा, सदस्य सचिव अनुपम मित्रा, सदस्य डॉ. नवीन प्रकाश सिंग, रतनलाल डागा, तसेच साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले, संचालक (वित्त) यशवंत गिरी, सर्व क्षेत्रीय सहसंचालक, सात सहकारी आणि सहा खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, २६ ऊस उत्पादक शेतकरी, ऊस नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

बैठकीत सर्व संबंधित घटकांचा समावेश केल्याबद्दल आयोगाच्या अध्यक्षानी समाधान व्यक्त केले आणि अशा स्वरूपाची ही पहिलीच बैठक असल्याचे उद्गार काढले.
शेती अवजारे आणि इतर साधन सामुग्रीवरील (उदा. खते इ.) जीएसटीचा ५ ते १८ टक्के एवढा आहे. त्याचा परतावा कधीच शेतकऱ्यांना मिळत नसतो. त्यामुळे ऊस उत्पादन खर्च वाढला आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणा आहेच. या स्थितीत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. उत्पादन खर्च वाढत जातो. त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यायचा असेल, तर सर्व शेती साधनांवरील जीएसटीचा दर पाच टक्के करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एफआरपी पद्धत सुरू झाली तेव्हा रिकव्हरी निकष साडेआठ टक्क्यांचा होता, मात्र तो वाढत वाढत आता साडेदहा टक्क्यांवर गेला आहे. एफआरपी वाढली असली, तरी तुलनेने शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून हा निकष घटवण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
साखर उत्पादन खर्च कसा कमी करता येईल, यावर कारखान्यांनी विचार करावा, अशी सूचना आयोगातर्फे करण्यात आली. तसेच हेक्टरी उत्पादन दहा वर्षांपूर्वी होते तेवढेच आजदेखील आहे. ते वाढवण्यासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न करावेत. ऊस लागत खर्च कमी करण्यासाठी फायदेशीर आंतरपिके घ्यावीत, अशा सूचनाही करण्यात आल्या.
मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने शंभर टनी उत्पादनाचे रहस्य सांगितले. मी गेल्या सहा वर्षांपासून एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेत आहे. सात फुटांची सरी आणि दोन उसाचे फुटाचे अंतर, संपूर्ण ड्रीप आहे, त्यामुळे माझा खर्च तर कमी झाला, उत्पादन चांगले वाढले, असे त्यांनी सांगितले.
डॉ. भोसले यांनी आभार मानले.