सावधान ! अवर्षण काळ आहे, आता खोडवा, निडवाच तारणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘डीएसटीए’च्या पुण्यातील चर्चासत्रात अत्यंत महत्त्वाचा सल्ला

पुणे : सलग दोन वर्षे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऊस लागवड अपेक्षित झालेली नाही. यंदाचा साखर हंगाम कसा बसा निघून जाईल, खरे संकट पुढच्या म्हणजे २४-२५ च्या साखर हंगामापुढे आहे, त्यासाठी उसाचा प्रचंड तुटवडा जाणवणार आहे, त्यातून खोडवा-निडवा शेतकरी आणि साखर उद्योग क्षेत्राला तारणार आहे. त्यामुळे सावधान राहा, खोडवा-निवडव्याचे जतन करा, असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला ‘डीएसटीए’च्या पुण्यातील चर्चासत्रात देण्यात आला.

DSTA ratoons seminar

दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया)च्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असो. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डीएसटीए’च्या शिवाजीनगर (पुणे) येथील सभागृहात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले. सुमारे दोनशे सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्यात सहभाग घेतला. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करताना, चांगल्या सूचनांचे यावेळी स्वागत करण्यात आले.

खोडवा-निडव्याचे लाभदायी व्यवस्थापन कसे करायचे याबाबत यावेळी तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून म. फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक डॉ. योगेंद्र नेरकर, आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संयोजक डॉ. संजीव माने, डॉ. सुरेश पवार, असो.चे सचिव मुकुंद कुलकर्णी, कार्यकारी सचिव गौरी पवार यांची उपस्थिती होती.

अपेक्षित पाऊस नसल्यामुळे राज्याच्या ऊस लागवडीत सलग दोन वर्षांपासून घसरण होते आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस उपलब्धता लक्षणीय प्रमाणात घटू शकते. परिणामी तो हंगाम केवळ ७०-८० दिवसांचा राहू शकतो, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

खताळ म्हणाले, ‘‘चालू हंगामापेक्षाही पुढील हंगामातील ऊस उपलब्धता घटू शकते. दुष्काळी स्थिती बघता ऊस पिकाचे उत्पादन व उत्पादकतेवर यंदा प्रश्नचिन्ह आहे. पुढील वर्षी राज्याचे ऊस उत्पादन ६००-६५० लाख टनापर्यंत घसरल्यास गाळप हंगाम ७० दिवसांपेक्षा जास्त चालू शकणार नाही. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न करावे लागतील. शेततळ्यांचा वापर करण्याविषयी टीका होत असली तरी आता ऊसासाठी शेततळ्यांचा वापर करायला हवा. ठिबक, तुषार व इतर तंत्र वापरून उत्पादकता टिकवावी लागेल. अडचणीच्या या काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे लागेल. खोडवे, निडवे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे.’’

डॉ. पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या ऊस शेतीने यापूर्वी अनुभवलेल्या दुष्काळी हंगामाचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक दुष्काळात खोडव्यानेच साखर उद्योगाला तारले आहे. यंदा ऊस उत्पादकता हेक्टरी ९० टनांपेक्षाही खाली जाईल व साखर कारखाने १०० दिवसांच्या आसपास चालतील. मात्र अवर्षण स्थितीमुळे पुढील हंगामात उसाची अतिटंचाई तयार होईल. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या सर्वच उसाचा खोडवा ठेवायला हवा.’’

पुढील हंगामात ऊस बेण्याची कमतरता भासू शकते, असा इशारा डॉ. नेरकर यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘उसामुळे साखर उद्योग उभा राहिला. त्यामुळेच ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडून आलेली आहे. मात्र, पुढील हंगामात ऊस उपलब्धता घटून या अर्थकारण अडचणीत येण्याची भीती आहे. त्यासाठी सर्व साखर कारखान्यांना दक्ष राहून यापुढे खोडवा, निडव्याच्या व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागेल.’’

नामवंत वैज्ञानिक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. एन. बी. मोरे, डॉ. भारत रासकर यांच्यासह ‘वेदांत ॲग्रो’चे डॉ. शिवाजीराव थोरात आणि ‘यूपीएल ॲग्री सोल्युशन्स’चे अमोल आंधळे यांनीही यावेळी सादरीकरण केले. सूत्रसंचालन गौरी पवार यांनी केले.

डॉ. सुरेश पवार यांनी या याविषयावर सविस्तर मार्गदर्शन करणारा लेख ‘शुगरटुडे’ मॅगेझीनमध्ये लिहिला असून, यावेळी त्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »