‘ज्यूस क्लॅरिफिकेशन’साठी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण

‘डीएसटीएआय’च्या चर्चासत्राला मोठा प्रतिसाद
पुणे : ‘ज्यूस क्लॅरिफिकेशन टेक्नॉलॉजीज फॉर इम्प्रूव्हिंग शुगर/इथेनॉल क्वालिटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात तंत्रज्ञांनी नव्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात साखर आणि इथेनॉलची गुणवत्ता आणखी वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने (डीएसटीएआय) या चर्चासत्राचे आयोजन केले होते. पुण्यातील ‘डीएसटीएआय’ सभागृहात हा कार्यक्रम झाला. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत (डी.लिट.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘डीएसटीएआय’चे अध्यक्ष एस. बी. भड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर डॉ. एम. के. डोंगरे, एम. आर कुलकर्णी, भरत तावरे, गौरी पवार यांचीही उपस्थिती होती. या सेमिनारला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एस. बी. भड यांनी स्वागतपर भाषण केले, पांडुरंग राऊत यांनी आपल्या भाषणात नव्या तंत्रज्ञानातील प्रगतीवर भर दिला.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘डीएसटीएआय’च्या उत्पादन समितीचे सहनिमंत्रक व्ही. एम. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात ज्यूस शुद्धीकरणासाठी नव्या तंत्रज्ञानाची गरज आणि सेमिनारचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर पहिल्या सत्राला प्रारंभ झाला. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ‘डीएसटीएआय’च्या उत्पादन समितीचे निमंत्रक भारत तावरे होते.
साखर आणि इथेनॉलची गुणवत्ता आणखी वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे, त्याची झलक सेमिनारमधील सादरीकरणात दिसून आली. या सत्रात एकूण पाच तंत्रज्ञानी सादरीकरण केले. त्यात श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, नॅशनल केमिकल लॅब्रॉटरीचे माजी शास्त्रज्ञ डॉ. मोहन के. डोंगरे, मानव गॅसेसचे संचालक मनीष भार्गव, विश्वराज शुगरचे माजी सरव्यवस्थापक विनायक भोसले आणि व्ही. एम. कुलकर्णी यांनी सादरीकरण केले.
दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी बी. बी. गुंजाळ होते. ‘उत्तम दर्जाची साखर/किण्वन प्रक्रियेसाठी व्हीए/पीएच अशुद्धी नियंत्रण’ या विषयावर सादरीकरण झाले.
त्यात राहुरी कृषी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. आर. एम. नाईक आणि ‘डीएसटीएआय’च्या संशोधक अर्चना येवले, ‘रिग्रीन एक्सेल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय देसाई, क्रेडो इम्पेक्सचे संचालक शंतनू कुलकर्णी आणि श्री दत्त इंडियाचे प्रमोद नेवासे यांनी भाग घेतला. ‘डीएसटीएआय’च्या सचिव गौरी पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर व्ही. एम. कुलकर्णी यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने सेमिनारची सांगता झाली.