तोडणीअभावी शेकडो एकर ऊस फडावरच!

स्थानिक कारखान्यांच्या सुस्त कारभारामुळे शेतकरी संकटात
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही शेकडो एकर ऊस अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत उभा आहे. जानेवारी महिना संपत आला तरी ‘सुरू’ (एक्का) उसाला अद्याप तोडणी मिळालेली नाही, त्यामुळे दुबार आणि तिबार उसाचे काय होणार? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. दरम्यान, मजुरांच्या टंचाईमुळे तोडणी लांबणीवर पडली आहे. उसाचा १० ते १२ महिन्यांचा कालावधी संपून आता उसाला ‘तुरा’ येऊ लागला आहे. यामुळे उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
नियोजनशून्य कारभार व दुजाभाव : अनेक कारखान्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये नाव असूनही प्रत्यक्ष तोडणी मिळत नाही. स्थानिक कारखानदार आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या उसाला प्राधान्य देत असल्याचा गंभीर आरोप सामान्य शेतकऱ्यांनी केला आहे. कागदोपत्री कार्यक्रम वेगळा आणि प्रत्यक्षात तोडणी तिसरीकडेच, असा सावळागोंधळ सुरू आहे.
परजिल्ह्यातील कारखान्यांचा आधार : स्थानिक कारखाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असताना, बाहेरील जिल्ह्यातील कारखाने मदतीला धावून आले आहेत. हे कारखाने आधुनिक यंत्रसामग्री आणि जादा मनुष्यबळाच्या जोरावर वेळेत ऊस उचलत आहेत. तसेच, एकरकमी जास्त दर (FRP) देत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे






