उसानंतर मक्याला येणार चांगले दिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे सूतोवाच

नवी दिल्ली : देश इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य करेल, असा विश्वास केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पीकाची मर्यादा लक्षात घेता, मका पिकापासून आणखी इथेनॉल मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. त्यामुळे उसानंतर मका पिकाला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

2021-22 मार्केटिंग वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे जे 2013-14 मध्ये केवळ 1.53 टक्के होते, शेतकरी आणि उद्योगांचे प्रयत्न आणि त्याला केंद्राच्या अनुकूल धोरणांची जोड यामुळे हे साध्य होत आहे, असे गोयल म्हणाले.

ते म्हणाले की, तेल विपणन कंपन्यांना (OMCs) इथेनॉलचा पुरवठा 2013-14 मध्ये 38 कोटी लिटरवरून 2021-22 मध्ये 408 कोटी लिटरपर्यंत वाढला. गेल्या नऊ वर्षात आम्ही मिश्रण 1.5 टक्क्यांवरून सुमारे 10.5 टक्क्यांपर्यंत आलो आहोत, त्यामुळे आम्ही निश्चितपणे 20 टक्के लक्ष्य गाठू,”

हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इथेनॉलच्या उत्पादनाला चालना देण्याच्या गरजेवर मंत्र्यांनी भर दिला आणि ऊस पिकातून पुरवठा वाढविण्यास मर्यादा असल्याने मका पिकापासून इथेनॉल तयार करण्यावर आता लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगितले.

2025 पर्यंत 20 टक्के लक्ष्य गाठण्यासाठी सुमारे 1,016 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. इतर वापरासाठी सुमारे 334 कोटी इथेनॉल लागणार आहे. त्यामुळे प्लांट 80 टक्के कार्यक्षमतेने चालतो हे लक्षात घेऊन आणखी 1,700 कोटी लिटर क्षमता निर्माण करण्याची गरज आहे.

गोयल म्हणाले की, इथेनॉल उत्पादनामुळे साखर उद्योग तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे आणि या मॉडेलची मक्यामध्येही पुनरावृत्ती होऊ शकते. मका उत्पादकांना चांगला फायदा मिळू शकतो.

“जर 10 टक्के मिश्रणावरून 20 टक्क्यांपर्यंत उडी मारायची असेल, तर मक्याची मोठी भूमिका असेल… इथेनॉल बनवण्यासाठी मका अधिक चांगला आहे. हे पर्यावरणपूरक पीक आहे कारण ते कमी पाण्यात पिकवता येते, त्याला खात्रीशीर बाजारपेठ मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे गोयल म्हणाले.

कृषी मंत्रालय मका पिकाची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी काम करत आहे, असे सांगून गोयल यांनी नमूद केले, की पेट्रोलमध्ये इथेनॉलचे उच्च मिश्रण शेतकरी, पर्यावरण आणि संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल. इथेनॉल क्षेत्राने मोठी गुंतवणूक आकर्षित केली आहे आणि रोजगार निर्मितीला मदत केली आहे. भारताचा कच्च्या तेलावरील (क्रूड ऑइल) आयात खर्च 50,000 कोटी रुपयांनी कमी होऊ शकते, ज्यामुळे परकीय चलनाच्या गंगाजळीची मोठी बचत होईल.

“मक्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. इथेनॉल तयार करण्यासाठी तुम्ही दुहेरी फीडस्टॉक (ऊस आणि धान्य) वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी उद्योगांना मदत करण्यास सरकार तयार आहे, असे गोयल यांनी आश्वस्त केले. ते म्हणाले की, इथेनॉल हे वास्तव आहे हे वाहन उद्योगाला कळले आहे. पुढचे पाऊल फ्लेक्सी इंधन इंजिन आणि इथेनॉल पंप असेल आणि त्यावर वेगाने काम सुरू आहे.

तत्पूर्वी, अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, 2022-23 मध्ये 12 टक्के, 2023-24 मध्ये 15 टक्के आणि 2024-25 मध्ये 20 टक्के मिश्रण गाठण्याचे लक्ष्य आहे.

ते म्हणाले की इथेनॉलची गरज अंदाजे 1,300 कोटी लिटर आहे, त्यापैकी 650 कोटी लीटर उसापासून आणि उर्वरित धान्यांसह इतर स्त्रोतांकडून आले पाहिजे.

चोप्रा म्हणाले की, मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी काही विशेष सवलतींशिवाय मक्याचे उत्पादन ३४ दशलक्ष टनांवरून ४२-४३ दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे अतिरिक्त सचिव सुबोध कुमार सिंग म्हणाले की, मक्याची उत्पादकता वाढवण्याची आणि मक्यापासून इथेनॉलचा उतारा वाढवण्याची गरज आहे. इथेनॉल उत्पादनासाठी अन्नधान्याची गरज १६५ लाख टन असेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »