गुऱ्हाळचालकाची फसवणूक ; ९ जणांवर गुन्हा

पुणे : शिरुर तालुक्यातील एका गुऱ्हाळचालकाची तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अरणगाव तालुक्यातील नऊ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी दिली होती. कुणाल ताराचंद मालचे (रा. खामखेडा धरणगाव), रामा लक्ष्मण भिल, बापू सदा भिल, शांताराम सोमा भिल, गोरख रामचंद्र भिल, नाना नामदेव भिल, संजय शांताराम भिल, विठोबा पंडीत भिल, आणि संजय सुरसिंग सोनवणे (सर्व रा. वराड बुद्रुक, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कुणाल ताराचंद मालचे (रा. खामखेडा, ता. धरणगाव) याने यापूर्वी गुऱ्हाळावर चांगले काम करून विश्वास संपादन केला होता. गुऱ्हाळावर कामगार आणतो, असे सांगून आठ कामगारांसाठी मे ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रत्येक कामगारांसाठी पन्नास हजार रुपयांप्रमाणे चार लाख रुपये फिर्यादी शरद आसवले यांच्याकडून उचल घेतली तसेच फोन पेने एक लाख अठ्ठावीस हजार रुपये मागवून घेतले. याची नोटरी एरोंडल येथे नोंद केली. त्यावर साक्षीदार म्हणून कुणाल ताराचंद मालचे व ईश्वर लक्ष्मण भिल यांनी सह्या केलेल्या आहेत. पैसे घेऊन देखील कामासाठी स्वतः अगर कामगारांना घेऊन तो आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शरद आसवले यांनी शिरूर ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास शिरूर पोलिस करीत आहेत.