भविष्यातील इंधन हायड्रोजन : नितीन गडकरी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

येत्या काही वर्षांत वाहने 100% इथेनॉलवर चालतील

“पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात अशी माझी इच्छा आहे,”

– केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी

बेगुसराय (बिहार): भारतासाठी भविष्यातील इंधन हायड्रोजन हेच असेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच येत्या काही वर्षांत देशातील वाहने शंभर टक्के हरित इंधनावर चालतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

बेगुसराय येथे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना गडकरी म्हणाले, “भारत दरवर्षी जीवाश्म इंधन आयात करतो… लवकरच आमचे शेतकरी हरित इंधन तयार करतील.”

“हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि आगामी काळात देशातील वाहने हरित इंधनावर धावतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहेत,” असे ते म्हणाले.

“इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे देशाची कृषी-अर्थव्यवस्था बदलेल… यामुळे शेतकरी ‘ऊर्जादाता’ (ऊर्जा पुरवठादार) बनतील… ते यापुढे केवळ ‘अन्नदाता’ (अन्न पुरवठा करणारे) राहणार नाहीत,” असे ते म्हणाले.

इथेनॉल उद्योग हा शेतकऱ्यांसाठी वरदान असून त्याची मागणी वाढून देशाची कृषी अर्थव्यवस्था बदलेल. पुढील काही वर्षांत मोटारसायकल, ई-रिक्षा, ऑटो-रिक्षा आणि कार 100 टक्के इथेनॉलवर आधारित असाव्यात, अशी माझी इच्छा आहे, असेही गडकरी म्हणाले.

येत्या काही वर्षांत कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, ज्याचा फायदा बिहारच्या शेतकऱ्यांनाही होईल. पंतप्रधान मोदींचे स्वप्न भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे आहे आणि त्यासाठी देशाला पायाभूत सुविधांच्या विकासाची गरज आहे… पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. एनडीए सरकार वेगाने काम करत आहे, असे सांगून ‘देशाच्या तसेच बिहारच्या विकासात आमची आघाडी राज्यातील सर्व 40 जागा जिंकेल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“लोकांना बिहारसह देशात कुठेही गेले तरी चांगल्या दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग मिळतील. आपला देश बदलत आहे… आपल्या गरीब आणि गरजू नागरिकांची काळजी घेणारे भारताला स्वावलंबी राष्ट्र बनवण्याचे आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न आहे,” अशी हमी त्यांनी दिली.

(याठिकाणी ‘शुगरटुडे’ला नमूद करणे आवश्यक वाटते की, साखर उद्योगाला हायड्रोजन निर्मितीमध्ये भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील नॅचरल शुगर समूह पहिला हायड्रोजन प्रक़ल्प उभारत असून, तो येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होणार आहे, ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.)

चौथ्या टप्प्यात बिहारमधील बेगुसराय, दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि मुंगेर लोकसभा जागांवर 13 मे रोजी निवडणूक होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »