इतरांपेक्षा चांगला ऊस दर देणार : रणजित मुळे

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्सच्या साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. आम्ही उसाला स्पर्धकांपेक्षा चांगला दर देऊ, असे आश्वासन कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी यावेळी दिले.
रणजित मुळे, कारखान्याचे तांत्रिक सल्लगार एस. एन. थिटे यांच्या उपस्थितीत श्वेता गणेश गंगणे यांच्या हस्ते नवमीच्या मुहूर्तावर बॉयलर पूजन आणि अग्निप्रदीपन झाले. कारखाना परिसरातील ऊस उत्पादक, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या हंगामामध्ये उसाचे लागवड क्षेत्र मागील हंगामापेक्षा कमी झालेली आहे. परंतु पाऊस चांगला झाल्यामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. गाळप हंगाम २०२४-२५ करिता तोडणी वाहतूक यंत्रणा व इतर पूर्व तयारी झालेली आहे. जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्र व संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुढील गाळप हंगाम २०२५-२६ करिता ऊस लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे.
यापूर्वीही गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केलेले आहे. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु गंगामाई कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे या हंगामातही आपले कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आपला ऊस गंगामाई कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करून ‘या हंगामात गंगामाई कारखाना परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्यास कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी दिली.
उपस्थित सर्व ऊस उत्पादक व विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पासून सुरू करण्यासाठी पूर्वतयारी झालेली असल्याचे व्हाईस प्रेसिडेंट व्ही. एस. खेडेकर यांनी सांगितले. उपस्थित सर्वांना कारखाना व्यवस्थापनाचे वतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.