साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या.

एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला, गेल्या पाच वर्षांत ५६७ रुपयांची वाढ केली त्याबद्दल आपले अभिनंदन. मात्र साखरेची एमएसपी वाढलेली नाही. आपण याबाबत निर्णय घ्यावा, अशी आमची सर्वांची विनंती आहे. सध्या साखर कारखान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एमएसपी वाढल्यास या अडचणींवर मात करता येईल, असे पाटील म्हणाले.

तसेच मागच्या वेळी आपण सी हेवी मोलॅसेस पासून बनणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केली, त्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आपले आभार व्यक्त करते. मात्र बी हेवी मोलॅसेस आणि शुगर सिरपपासून बनणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ झालेली नाही. याबाबतही आपण निर्णय घ्यावा, अशी आग्रहाची विनंतीही पाटील यांनी केली.

पाटील यांनी आणखी एका महत्त्वाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मागच्या हंगामात बी हेवी मोलॅसेस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादनावर निर्बंध घालण्यात आले. त्यावर फेरविचार करावा आणि ते मागे घ्यावेत, कारण मार्केटमध्ये पुरेशी साखर उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

सर्वसामान्य ग्राहकांसाठी पुरेसा साखर साठा शिल्लक असल्याने, सुमारे २० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही महासंघाच्या अध्यक्षांनी केली.

आपल्या भाषणात पाटील यांनी शहा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. केंद्रात प्रथमच स्वतंत्र सहकार खाते निर्माण करण्यात आले आहे आणि त्याचे प्रमुख आपण असल्यामुळे आम्हा सर्वांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत, असे ते म्हणाले.
(सविस्तर भाषण ऐका खालील लिंकवर)
साखर उद्योगाचा रोडमॅप आवश्यक….

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »