इथेनॉलला १० रूपये वाढवून द्या : इस्मा

मुंबई : केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशामुळे साखर उद्योगातील स्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्योगाचे नुकसान होणार आहे, ते काही प्रमाणात भरून निघावे यासाठी इथेनॉलच्या दरात प्रति लिटर दहा रुपयांची त्वरित वाढ करावी, अशी मागणी ‘इस्मा’चे (ISMA -इंडियान शुगर मिल्स असो.) उपाध्यक्ष एम. प्रभाकर राव यांनी केली आहे.
श्री. राव येत्या १५ डिसेंबर रोजी ‘इस्मा’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्य आदित्य झुनझुनवाला अध्यक्ष असून, त्यांचा कार्यकाल १५ रोजी संपत आहे.
यंदा साखर उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेने केंद्राने इथेनॉल उत्पादनावर निर्बंध घालणारा आदेश जारी केला. देशी बाजारपेठेत पुरेसा साखर साठा राहावा आणि दर स्थिर राहावेत या उद्देशाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये केंद्राच्या ‘इबीपी’मुळे (इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम) उद्योगाने इथेनॉल उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा आम्हाला मोठा फटका बसणार आहे, असे राव म्हणाले.
उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादनाला संपूर्णपणे बंदी घालण्यात आल्याने, आमच्या उत्पादन प्रक्रियेला खिळ बसेल. केवळ बी हेवी मोलॅसेसपासून उत्पादन करून ही मोठी झीज भरून येणारी नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की, उसाचा रस किंवा शुगर सिरपपासून जेवढ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होणार होते, तेवढा इथेनॉल बी हेवी मोलॅसेसपासून उत्पादन करण्याची परवानगी मिळावी आणि तो ऑईल कंपन्यांनी खरेदी करावा, अशी आमची मागणी राहील. सरकारने ही हमी दिली, तर काही प्रमाणात साखर उद्योगाला दिलासा मिळू शकेल, असेही राव ‘झी बिझनेस’ चॅनेलशी बोलताना म्हणाले.
या इथेनॉल बंदीमुळे २५ ते ३० लाख टन अधिकची साखर यंदा तयार होईल, असा सरकारचा अंदाज आहे. त्यामुळे साखर दर स्थिर राहतील, अशीही सरकारला आशा आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांची बिले चुकती करण्यातही यंदा विलंब लागू शकतो, अशी शक्यताही राव यांनी व्यक्त केली. सरकारने इथेनॉलला प्रति लिटर दहा रुपये वाढवून दिले तरी साखर उद्योगाचा लाभ होणार नाहीच, मात्र काहीसा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.