एफआरपी: कल्लाप्पाण्णा आवाडे कारखाना राज्यात नं. 1

येडेश्वरी ॲग्रोच्या नावावर भोपळा
पुणे : यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, एफआरपीचे आकडेही लक्ष वेधून घेत आहेत. हुपरीच्या (कोल्हापूर) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.
साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या कारखान्याने ४१९ कोटी ३६ लाख रुपये एफआरपी रक्कम वितरित केली आहे. (ही रक्कम ऊस वाहतूक आणि ऊसतोड खर्चासह आहे.) शिवाय हे प्रमाण शंभर टक्के आहे. ३१ जानेवारीअखेर, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली अंतिम रक्कम ३३५ कोटी ५६ लाख रूपये आहे.
राज्यातील एकूण ७६ साखर कारखान्यांनी (खासगी आणि सहकारी) शंभर टक्के एफआरपी रक्कम दिली आहे. त्यात जवाहर साखर कारखाना अव्वल आहे.
एफआरपी देण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना. या कारखान्याने ३५९ कोटींची एफआरपी रक्कम दिली आहे. हे प्रमाण १०० टक़्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याने ३१९ कोटी १८ लाख रुपये अदा केले आहेत. त्यानेही शंभर टक्के एफआरपी रक्कम चुकती केली आहे.
आसुर्ले-पोर्लेचा साखर कारखाना दालमिया शुगर चालवते. हा कारखाना सुमारे तीनशे कोटी एफआरपी रकमेसह राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
आमदार रोहित पवार यांच्या शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो या खासगी साखर कारखान्याने २८७ कोटींची एफआरपी रक्कम चुकवली असून, हा कारखाना राज्यात पाचव्या स्थानी असला, तरी एफआरपी देण्याचे प्रमाण ८६ टक़्के आहे. १४ टक्के थकबाकी आहे. टॉप १२ यादीतील बारामती ॲग्रो आणि इंडिकॉन हे दोनच कारखाने एफआरपीचे थकबाकीदार आहेत.
राज्यात सहाव्या क्रमांकावर असलेल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने शंभर टक्के एफआरपी रक्कम दिली असून, ही रक्कम २८१ कोटी ३३ लाख रुपये आहे.
सातव्या क्रमांकावर शिरोळचा श्री दत्त सहकारी साखर कारखाना, तर आठव्या क्रमांकावर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे.
छत्रपती शाहू सहकारी कारखाना नवव्या, माळेगाव कारखाना दहाव्या, इंडिकॉन शुगर फॅक्टरी अकराव्या, तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचा बारावा क्रमांक लागतो. हंगाम संपल्यानंतर अंतिम यादीमध्ये हे क्रमांक बदलू शकतात.
श्री दत्त कारखान्याने सुमारे २३५ कोटींची एफआरपी दिली, तर सोमेश्वरने २३० कोटींची रक्कम एफआरपी पोटी जमा केली आहे.
शाहू कारखान्याने २२० कोटी, तर २१६ कोटी ४० लाखांची रक्कम अदा केली. इंडिकॉन शुगरने २११ कोटी ६० लाख आणि मोहिते कारखान्याने २१० कोटी एफआरपी रक्कम दिली आहे.
हे कारखाने पिछाडीवर
सातपुडा, राजगड असे कारखाने शेतकऱ्यांची उसाची बिले देण्यात, म्हणजे खूपच मागे पडले आहेत. बार्शीच्या येडेश्वरी ॲग्रोने अद्याप एकही पै दिलेला नाही, अर्थात त्याचे गाळप काही हजार टनांत आहेत. तरी पाच कोटींची थकबाकी आहे.
भोरच्या राजगड सहकारी साखर कारखान्याकडे १२९ कोटींची थकबाकी आहे. अवघे दहा कोटींची बिले दिली आहेत. मात्र सुमारे सहा लाख टन गाळप केले आहे.
सातपुडा सहकारी साखर कारखाना आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना (सध्या वेंकटेश्वरा) यांनी एफआरपीची अल्प रक्कम दिली आहे