‘लोकनेते देसाई’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दौलतनगर – लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी व्यक्त केला.

कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे, असे नमूद करून हा कारखाना नावारूपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. म्हणून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११ टक्के बोनस देत आहोत, असे यशराजदादा यांनी जाहीर केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

चेअरमन म्हणाले की, यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद आणि पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप क्षमतेचा विस्तार करून तीन हजार टन करण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामगारांची टंचाई निर्माण होत असते. या टंचाईवर मात करण्यासाठी आगामी गळीत हंगामात हार्वेस्टरच्या मार्फत ऊस तोडणी साठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी वेळेत होईल .

17 कोटींची मदत राज्य शासनाने देसाई कारखान्याला तातडीने केली त्याबद्दलही राज्य शासनाचे त्यांनी आभार मानले.

आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र निम्म्याहून अधिक डोंगरी भागात आहे. संपूर्ण पाटण तालुक्यातील उसाच्या लागवडीचा विचार करता, ती तीन ते साडेतीन लाख मे. टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना, आपल्या कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे. त्यामुळे बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालण्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र बाबासाहेब पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वत्सला रामचंद्र पाटील यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, अशोकराव पाटील, ॲङ. डी. पी. जाधव, ॲङ. मिलिंद पाटील, जालंदर पाटील, बबनराव भिसे, सुनील पानस्कर, सर्जेराव जाधव, विकास गोसावी, सुनील पवार, बी.आर.पाटील, गोरख देसाई, प्रकाशराव जाधव, बशीर खेांदू, शशिकांत निकम,अधिक पाटील, राजाराम मोहिते, कार्यकारी संचालक सुहास देसाई, तसेच कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »