बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट; दोन कर्मचारी ठार

जालना : परतूर जवळील वरफळ शिवारातील माँ बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या गंधक (सल्फर) भट्टीच्या स्फोटात दोन कर्मचारी जागीच ठार झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
आबासाहेब शंकर पारखे (वय ४४, रा. शिरसगाव ता. परतूर), पर्यवेक्षक अशोक तेजराव देशमुख (रा. राहुरी ता. सिंदखेडराजा) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नवनाथ पांढरपोटे व कदीर पटेल (रा. वरफळ) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर परतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
आबासाहेब शंकर पारखे (वय ४४, रा. शिरसगाव, ता. परतूर), अशोक तेजराव देशमुख (रा. राहुरी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) अशी मयतांची नावे आहेत. परतूर-सेलू मार्गावर शिवाजी जाधव यांचा माँ बागेश्वरी साखर कारखाना आहे. या कारखान्यातील सल्फर भट्टीजवळ नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी चार कामगार काम करीत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या सल्फर भट्टीचा स्फोट झाला. त्यात भट्टीवर काम करणारे चार जण जखमी झाले. या भट्टीजवळ तीन ते चार कर्मचारी कार्यरत असतात.
स्फोट झाल्यानंतर वाफेच्या उष्णतेने दोन्ही मयताच्या अंगावरील कपडे फाटून पायाला व शरीरावर इतर ठिकाणी मोठ्या जखमा झाल्या होत्या. स्फोट होताच हे कर्मचारी बाजूला फेकल्या गेल्याने डोक्यालाही मार दिसत होता.
अपघातानंतर चीफ केमिस्ट मधुकर कछवे, सोपान मोरे, विष्णू खरात, वसंत कदम, माधव साखळकर यांनी जखमींना परतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सल्फटेशनमेन आबासाहेब शंकर पारखे, ज्यूस सुपरवायझर अशोक तेजराव देशमुख या दोघांना मृत घोषित केले. तर नवनाथ पंढरपूर (रा. वरफळवाडी) व कदीर पटेल (रा. वरफळ) या दोघांवर उपचार सुरू आहेत.
घटना घडताच भट्टीजवळ असलेल्या अग्निशमन गाडीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग इतरत्र पसरली नाही.. दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार प्रतिभा गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी चौरे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी भेट देऊन पाहणी केली.
चेअरमन शिवाजी जाधव म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. हे कसे घडले यासाठी तज्ज्ञांचे पथक बोलावून याचा बारकाईने अभ्यास करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांचा मोठा विमा काढलेला आहे. त्यामुळे नातेवाइकांना नियमानुसार भरीव मदत दिली जाईल.
कारखान्यावरील चीफ केमिस्ट कछवे म्हणाले की, भट्टीमध्ये सल्फर डायऑक्साइड (एसओ २) गॅस तयार होतो. हा गॅस उसाच्या रसामध्ये वापरण्यासाठी उपयोगी पडतो. या भट्टीमध्ये बँक प्रेशर तयार होऊन हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आम्ही चौकशी करीत आहोत.
साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अशा घटना टाळण्यासाठी हायड्रॉलिक टेस्ट आणि ऑफ सीझन काळात योग्य इन्स्पेक्शन होणे गरजेचे आहे, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.
‘शुगरटुडे’च्या वतीने दोन्ही दुर्दैवी कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना बागेश्वरी साखर कारखाना नक्कीच मदतीचा हात देईल, अशी अपेक्षा.