अजित पवार समर्थकांचा जल्लोष, निलकंठेश्वर पॅनल आघाडीवर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला आहे. निळकंठेश्वर पॅनलच्या समर्थकांकडून जोरदार घोषणबाजीला सुरुवात झाली आहे.

अजित पवार हे स्वत: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. त्यांच्या नेतृत्त्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. निळकंठेश्वर पॅनल यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची पॅनेल्स रिंगणात होती. मात्र, अजित पवार यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळण्याचे संकेत मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलावरून मिळत आहेत. सध्या अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजय घोषित करण्यात आले आहेत. तर उर्वरित जागांवरही बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत

मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या दिवशी ब प्रवर्गातून अजित पवार विजयी झाले होते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली होती. यावेळी अजित पवार यांचे दोन उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत. रतन कुमार साहेबराव भोसले यांनी 1487 मतांनी बापूराव गायकवाड यांचा पराभव केला.

इतर मागासवर्गीय प्रवर्गातून  अजित पवारांच्या पॅनलचे नितीन शेंडे 8494 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांचा 1153 मतांनी पराभव केला. त्यांना 7341 मतं मिळाली. बुधवारी संध्याकाळपर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत तावरेंच्या पॅनलने अजितदादांना जोरदार टक्कर दिल्याचे मतमोजणीवरून दिसते. मात्र शरद शरद समर्थकांच्या पॅनलला दारूण पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्याचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ‘शुगरटुडे’ने यापूर्वी म्हटल्याप्रमाणे खरा सामना अजितदादा आणि तावरे यांच्या पॅनेलमध्येच आहे. काका विरुद्ध पुतण्या असे मुंबईच्या माध्यमांनी उभे केलेले चित्र साफ फसल्याचे दिसत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »