पन्नगेश्वरच्या सभासद, कामगारांसाठी प्रयत्न करणार : आ. कराड

लातूर : रेणापूर पानगाव भागातील शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या उद्देशाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पन्नगेश्वर कारखान्याची उभारणी केली. त्याच अनुषंगाने कायद्याच्या बाजूने विचार करून या कारखान्याच्या शेतकरी सभासद, शेअर्सधारक आणि कामगाराच्या हितासाठी न्याय हक्कासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कारखान्याचा बँकेने लिलाव करून विक्री केला. त्यामुळे शेतकऱ्यांसह कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशाही परिस्थितीत काहीजण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा शेतकऱ्यांसह कामगारांनी अशा संधीसाधूपासून वेळीच सावध राहाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, ज्या काळात ऊस कोणीच घेऊन जात नव्हते, शेतकऱ्यांना आपला ऊस तोडून बांधावर टाकण्याची पाळी आली होती अशा या परिस्थितीत शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेणापूर आणि पानगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्रपणे पन्नगेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आणि अनेकांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून येऊ लागली मात्र दुर्दैवाने लोकनेते मुंडेसाहेबांचे अकाली निधन झाले आणि त्यांच्या पश्चात शेतकऱ्यांचा तारणहार समजला जाणारा पन्नगेश्वर हा साखर कारखाना डबघाईला आला.