“रिलायन्स” प्रेस मडच्या शोधात, अनेक कारखान्यांशी चर्चा सुरू
मुंबई – भारतातील अग्रगण्य उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मोठ्या प्रमाणावर ‘प्रेस मड’ हवा आहे. त्यासाठी कंपनी देशातील अनेक साखर कारखान्यांशी चर्चा करत आहे. ‘प्रेस मड’ चा उपयोग कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) तयार करण्यासाठी होतो.
कंपनीच्या अंतर्गत स्त्रोतांचा हवाला देत इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, “आरआयएल मोठ्या साखर कारखान्यांकडून कंपनीच्या CBG प्लांटसाठी सक्रियपणे ‘प्रेस मड’ शोधत आहे. कंपनीने देशभरात विविध ठिकाणी पसरलेल्या प्रेस मडचा पुरवठा करण्यासाठी सक्षम असलेल्या मोठ्या साखर कारखान्यांशी संपर्क साधला आहे,” असे चर्चेत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत रिलायन्सशी संपर्क साधला असता, कंपनीने प्रश्नांना उत्तर दिले नाही.
सप्टेंबरच्या घोषणेमध्ये, RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुढील पाच वर्षांत 100 CBG प्लांट्स स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांची रूपरेषा जाहीर केली होती.. सध्या, RIL बाराबंकी, उत्तर प्रदेश येथे CBG प्लांट चालवते, CBG उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे.
अलीकडे, 21 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे बंगाल ग्लोबल बिझनेस समिटच्या 7 व्या आवृत्तीत बोलताना अंबानी म्हणाले की, कंपनीच्या स्वदेशी विकसित तंत्रज्ञानावर आधारित समूह भारतातील सर्वात मोठा जैव-ऊर्जा उत्पादक बनला आहे.
“जैव-ऊर्जेसह नवीन उर्जेमध्ये अनेक उपक्रमांसह रिलायन्स ही जबाबदारी पार पाडत आहे. भारतामध्ये जैवऊर्जेचा सर्वात मोठा उत्पादक बनण्याची क्षमता आहे. पुढील तीन वर्षांत 100 कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) संयंत्रे स्थापन करण्याचे आमचे लक्ष्य आहे”.
अंबानी यांनी पुढे सांगितले, की रिलायन्स शेतकऱ्यांना ‘ऊर्जा निर्मितीक्षम पिकांची लागवड’ वाढविण्यात मदत करेल. आम्ही शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागवड करण्यास मदत करू. यामुळे सुमारे 2 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि दरवर्षी 2.5 दशलक्ष टन सेंद्रिय खत तयार होईल. आम्ही बंगालमध्ये CBG प्लांट्स उभारण्याची योजना आखत आहोत, ज्यामुळे बंगालचे शेतकरी अन्नदाता आणि उर्जादाता बनतील. अन्न तसेच उर्जा उत्पादक म्हणून त्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. या तीन व्यवसायांमध्ये आमच्या सध्याच्या आणि नवीन गुंतवणुकीसह, रिलायन्स बंगालच्या महान लोकांसोबत सामायिक समृद्धी, तांत्रिक नवकल्पना, सर्वसमावेशकता आणि सुसंवादाच्या भविष्याकडे कूच करेल.