राज्यातील ९२ कारखान्यांकडून अद्याप ‘एफआरपी’ नाही : अजित पवार

बारामती : साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल ९२ साखर कारखान्यांकडून अद्याप ८६४ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी शेतकऱ्यांना येणे बाकी आहे, त्यामुळे २० साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करीत साखर ताब्यात घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, उसाच्या एफआरपी दरात सातवेळा वाढ झाली ; परंतु, साखरेची एमएसपी एकदाच वाढलेली आहे. ती वाढावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एफआरपीत वाढ होत असताना एमएसपी देखील वाढली पाहिजे; म्हणजे एमएसपीच्या आत कारखान्यांना साखर विकता येणार नाही. त्यासाठी केंद्राकडे आवश्यक तो पाठपुरावा सुरू असून, याबाबत लवकरच अमित शहा यांचीही भेट घेतली जाणार आहे. एकीकडे तोडणी वाहतूक खर्च आता २०० रुपये टनांपर्यंत गेला आहे. यासह इतर खर्च वाढले आहेत, त्यामुळे ऊस उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साखरेच्या दराच्या ८५ ते ९० टक्के रक्कम बँकांकडून कर्जाऊ दिली जाते. दैत्यातून ऊस बिल भागवावे लागते. तोडणी वाहतूक खर्च द्यावा लागतो. शेतकऱ्यांना अॅडव्हान्स द्यावा लागतो. त्यामुळे एमएसपी वाढ गरजेची आहे.