पाकिस्तानची शरणागती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

१६ डिसेंबर

डॉ. कल्याण वासुदेव काळे- संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक (जयंती)
साळबा विनायक ऊर्फ बबन प्रभू- प्रहसनाचे बादशहा. (जयंती)
दत्तात्रय दामोदर दाबके- अभिनेते, दिग्दर्शक, छायाचित्रकार. (स्मृतिदिन)
काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल- सर्कस सम्राट. (स्मृतिदिन)

…………………………………………………………….

विजय दिन शक्ति शौर्यसाधना दिन

१६ डिसेंबर १९७१ स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक सोनेरी दिवस ! अखंड भारताच्या दोन बाजू खंडित करून पाकिस्तान राष्ट्राची निर्मिती झाली. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या मध्ये भारत भौगोलिक दृष्ट्या दिसत होता. भविष्यात पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानला जोडणाऱ्या भागात मुस्लिम बहुसंख्य भाग तयार करून भारताला दक्षिण उत्तर विभागण्याचा मोठा कट होता. ह्या कटावर प्रहार करून शत्रूराष्ट्राला खिळखिळं करून त्याचीच दोन शकले करून राष्ट्रीय एकता व एकसंधता अबाधित राखण्याचा कूटनैतिक व सामरिक यशस्वी प्रयत्न म्हणजेच १९७१ चे युद्ध !

या युद्धात भारताला पराभूत करण्याची वल्गना करणाऱ्यांचे ९३,००० सैनिक भारताने युद्धकैदी बनवले. पाकिस्तानला बिनशर्त शरणागती पत्करावी लागली व बांगलादेश हा स्वतंत्र देश निर्माण झाला. भारतही भविष्यातील विभागणी पासून काही अंशी संरक्षित झाला. या युद्धात भारतीय सैनिकांनी अभूतपूर्व विजय मिळवला. त्यासाठी काही सैनिकांचे बलिदानही कामी आलं. या विजयाची आठवण म्हणून भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतात.

१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

१९३३ : लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म

लोकसाहित्य या अभ्यास शाखेला विद्यापीठीय पातळीवर आणि अभ्यासकांच्या पातळीवर अधिकाधिक ‘जाणतं’ करणाऱ्या संशोधकांच्या परंपरेत डॉ. प्रभाकर मांडे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. लोकसाहित्य संशोधन मंडळाच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्रात या विषयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची मोठी फळी उभी केली. महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित करून या परिषदांमधून डॉ. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. अशोक रानडे, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. तारा परांजपे, डॉ. तारा भवाळकर आदी मान्यवरांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून देण्यात डॉ. मांडे यांचे मोलाचे योगदान होते.

लोकसाहित्य परिषद ही एक चळवळच महाराष्ट्रात सुरू झाली. त्याचे नेतृत्व मांडे यांनी केले आणि आजही करीत आहेत. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अभ्यास अधिकाधिक शास्त्रपूत कसा होईल, याचा विचार डॉ. मांडे यांनी अभ्यासकांमध्ये रुजविला.

लोकसाहित्याचे स्वरूप, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह, लोकगायकांची परंपरा, लोकरंगभूमी, मौखिक वाङ्मयाची परंपरा, लोकमानस रंग आणि ढंग, मांग आणि त्यांचे मागते, गावगाड्याबाहेर, लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, अशा अनेक मौलिक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली व मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतः असे सिद्धांतही तयार केले.
सामाजिक अस्वस्थता आणि असुरक्षितता वाढली, की जीवन आधाराच्या नव्या वाटा आपण शोधू लागतो. या नव्या वाटांवर लोककलांच्या पताका मोठया आश्वासक पद्धतीने आपल्याला खुणावतील आणि जगण्याचे नवे बळ देतील हे निश्चित! असे मत डॉ. मांडे अग्रहाने मांडतात.

आदिवासी मूलत: हिंदूच, आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या, उपेक्षित पर्व, कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप), गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत, गावगाड्याबाहेर, चतुरदास विरचित एकादश स्कंध भाषाटीका (हिंदी, संपादित), दलित साहित्याचे निराळेपण अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे

सन २०१० आणि २०१८मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले


…………………………………….
डॉ. कल्याण वासुदेव काळे- संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक
जन्म : १६ डिसेंबर १९३७.

हे एक मराठी लेखक आहेत. हे मुख्यत्वे भाषेविषयी लिहितात. काळे हे एम. ए. (संस्कृत), एम. ए. (मराठी) असून त्यांनी, ‘पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. (मराठी) मिळवली आहे. त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉ. य. वि. परांजपे आणि कै. न. चिं. केळकर ही दोन पारितोषिके मिळाली आहेत.

काळे हे पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते. त्यांना महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापनाचा ३१ वर्षांचा अनुभव आहे. १९६६ पासून यांनी नंदुरबार महाविद्यालय, पश्चिम विभागीय भाषा केंद्र (डेक्कन कॉलेज), पुणे विद्यापीठ या संस्थांत, मराठी साहित्य, संस्कृत, मराठी भाषा आणि भाषाविज्ञान या विषयांचे अध्यापन केले आहे. पीएच.डीचे ते संशोधक मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक ग्रंथांत व विविध वाङ्मयीन नियतकालिकांत लेखन केले आहे.

प्रकाशित पुस्तके: पराड्याचे हंसराज स्वामी : चरित्र, वाङ्मय आणि तत्त्वज्ञान; भाषांतरमीमांसा (सहलेखिका – डाॅ. अंजली सोमण); भाषाविज्ञान : स्वरूप आणि पद्धती; मराठी अक्षरलेखन; लर्निग मराठी; Learning Marathi Through English (सहलेखिका – डाॅ. अंजली सोमण); व्यावहारिक मराठी; निवडक भाषा आणि जीवन.
…………………………………….
साळबा विनायक ऊर्फ बबन प्रभू- प्रहसनाचे बादशहा.
(जन्म : १६ डिसेंबर १९२६; निधन : २७ ऑगस्ट १९८१)

बबन प्रभू हे मराठी रंगभूमी आणि मुंबई दूरदर्शनवरचे एकेकाळचे अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते आणि प्रहसनाचे बादशहा म्हणून ओळखले जातात. मराठी रंगभूमीवर तोपर्यंत फारसे प्रचलित नसलेले एकाहून एक धमाल, गडबडघोटाळ्याचे फार्स त्यांनी स्वतः लिहून आत्माराम भेंडेंबरोबर रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि प्रेक्षकांना लोटपोट हसवलं.

लॉरेल-हार्डी जोडीतल्या स्टॅन लॉरेलसारखाच मूर्तिमंत भोळा भाबडा चेहरा, कृश शरीरयष्टी आणि शब्दफेकीची एक खास वेगळीच लकब याने ते हातखंडा हशा पिकवित असत. त्यांचा स्टेजवरचा वावर कमालीचा सहज होता. विनोदनिर्मितीसाठी लागणाऱ्या टायमिंगची त्यांना उत्तम जाण होती.

त्यांनीच लिहिलेल्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’मधला भोळसट दिनू, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’मधला बन्सीधर ज्यांनी स्टेजवर त्या काळी पाहिला असेल ते खरंच भाग्यवान! त्यांनी मुंबई दूरदर्शवरसुद्धा धमाल उडवून दिली होती. रविवारी सकाळी याकूब सईदबरोबर ते ‘हास-परिहास’ नावाचा एक तुफान विनोदी कार्यक्रम सादर करीत असत, ज्यात चक्क धमाल विनोदी जोक्स सादर (अभिनित) केले जायचे.

चोरावर मोर, झोपी गेलेला जागा झाला, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे तो, माकड आणि पाचर, घोळात घोळ अशी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत.
…………………………………….
दत्तात्रय दामोदर दाबके
आज दिग्दर्शक, छायाचित्रकार व भारतीय चित्रपटसृष्टिचे पहिले नायक दत्तात्रय दाबके यांचा स्मृतिदिन.

रत्नागिरी जिल्ह्यातील आसोद हे दत्तात्रेय दामोदर दाबके यांचे मूळ गाव. परंतु त्यांचे वास्तव्य बनारसाला असल्यामुळे त्यांना उर्दू, हिंदी भाषा अवगत होत्या. मॅट्रिकमध्ये असतानाच त्यांना नाटकात भूमिका करायची ओढ लागली. याच काळात त्यांनी उर्दू नाटकांमध्ये कामे केली. नाटकांमध्ये कामे करण्याच्या निमित्ताने ते मुंबईत आले.

मुंबईत आल्यावर त्यांना समजले की दादासाहेब फाळके मूकपट काढायच्या खटपटीत आहेत. दत्तात्रय दाबके नाटकाचा विचार सोडून लगेच फाळकेंना भेटले. फाळकेंनी त्यांची शरीरयष्टी पाहून त्यांना ‘राजा हरिश्चंद्र’मध्ये हरिश्चंद्राची भूमिका दिली. परंतु त्यानंतर फाळके यांच्या लक्षात आले की दत्तात्रय दाबके यांच्यामध्ये दिग्दर्शनाची क्षमता आहे.

त्यामुळे त्यांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नेमले. दत्तात्रय दाबकेंनी दिग्दर्शन व छायालेखन या दोन्ही क्षेत्रात फाळकेंच्या हाताखाली पाच वर्षे उमेदवारी केली. नंतर त्यांनी फाळकेंची साथ सोडली. १९२२ मध्ये त्यांनी द्वारकादास संपन यांच्या कोहिनूर फिल्म कंपनीत दिग्दर्शक व छायालेखक म्हणून नोकरी धरली.

नट होण्यासाठी दत्तात्रेय दामोदर दाबके चित्रपटात आले, पण उत्तम छायाचित्रकार म्हणून त्यांनी नाव मिळवले. ट्रिक फोटोग्राफी हा त्यांचा हातखंडा विषय ठरला. दत्तात्रय दाबके यांचे १६ डिसेंबर १९४६ रोजी निधन झाले.
…………………………………….
काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल- सर्कस सम्राट.
(जन्म : १८९९; निधन : १६ डिसेंबर २०००)

ब्रिटिश अंमलात अनेक यूरोपीय सर्कशी भारतात येत व प्रमुख शहरी खेळ करून जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस काढणारे आदय सर्कस चालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे हे होत.

त्यांनी १८७८ मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ते स्वत: उत्कृष्ट अश्वशिक्षक असून, घोडयांवरील कसरतींची अनेक कौशल्यपूर्ण कामे सर्कशीत करीत. त्यांनी १८८४ मध्ये विल्सन सर्कस खरेदी करून अनेक यूरोपीय कसरतपटू आपल्या सर्कशीत घेतले. त्यांनी आपल्या सर्कसला ‘ग्रँड इंडियन सर्कस’ हे नाव देऊन भारतभर तसेच परदेशांतही दौरे काढले.

छत्रे सर्कशीत असलेले सदाशिव कार्लेकर यांनी १८८३ मध्ये सांगली येथे ‘कार्लेकर गँड सर्कस’ची स्थापना केली. प्रचंड शिकारखाना हे छत्रे सर्कसचे प्रमुख वैशिष्टय; तर त्या काळातील जेंकिन्स व फॅमिलीचे चित्त-थरारक मोटारसायकल उड्डाण हे कार्लेकर सर्कशीचे खास आकर्षण होते, १९४३ मध्ये ती बंद पडली. छत्रे यांच्या सर्कशीत नाव कमावलेले देवल बंधू यांनी आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ १८९५ मध्ये काढून भारतभर व परदेशांतही दौरे करून चांगली नावारूपाला आणली.

ही सर्कस ‘ग्रेट इंडियन सर्कस’ या नावाने प्रसिद्ध होती. १९५७ साली ती बंद पडली. शारीरिक कसरतींचे खेळ व पशूंची कौशल्याची कामे ही या सर्कसची लक्षणीय वैशिष्टये होती. काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदूषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘द बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवली. सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले.


(संकलक – संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »