प्रेरणादायी जीवनकथा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे…

डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म. शिक्षण अवघं दहावी. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पुण्यातील मोटर रिवाइंडिंगच्या वर्कशॉपमध्ये साधा हेल्पर म्हणून केली आणि पुढे चालून स्थापन केला आदर्श साखर कारखाना – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना.  त्यांनी केवळ साखर कारखानाच नव्हे, तर इतरही अनेक संस्था उभ्या केल्या. ‘शून्यातून विश्व निर्मिती’ हा वाक्प्रचार राऊत यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतो. त्यांची जीवनगाथा वाचू या त्यांच्याच शब्दांत…….. त्यांनी सांगितलेली अत्यंत प्रेरक जीवनकहाणी! त्यांचा 1 जून रोजी वाढदिवस.  त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

ही खूप जुनी गोष्ट आहे. 1975 चा काळ असावा. त्यावेळी मी पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये मोटर रिवाइंडिंगची कामे करत होतो. विशेषत: ही कामे साखर कारखान्यांचीच होती. मला 120 रुपये पगार होता. त्यावेळी आमच्या वडिलांनी 8-9 एकर ऊस लावला होता. पाऊसमान चांगले झाल्याने ऊस जोमदार आला, पण कोणताच कारखाना ऊस न्यायला तयार नव्हता. आमचे ऊस शेत शिरूर तालुक्यातले. या तालुक्यात एकही साखर कारखाना नव्हता.

त्यामुळे आमच्या वडिलांनी गुर्‍हाळ करायचे ठरवले. त्यांना मी मदत करायचा निर्णय घेतला आणि आमचे मालक वर्तक यांना भेटलो आणि नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्याच कारखान्यात मी कामाला होतो. वर्तक साहेब म्हणाले, मला सांगितलं असतं तर मी बृहन्महाराष्ट्र सिंडिकेटला तुमचा ऊस न्यायला सांगितले असते.

‘मात्र आता खूप उशीर झाला आहे. आम्ही गुर्‍हाळ घराची संपूर्ण तयारी केली आहे. क्रशर विकत घेतला आहे. मला गुर्‍हाळात काम करणे गरजेचे आहे, म्हणून माझा राजीनामा मंजूर करावा,’ अशी विनंती मी वर्तक यांना केली. वर्तक यांनी माझा राजीनामा फाडला आणि सांगितले, ‘तुझे गुर्‍हाळ पूर्ण झाले की परत माझ्याकडे जॉइन हो.’

आणीबाणी आणि संघाचे संस्कार

श्री. वर्तक यांचा माझ्यावरचा विश्वास पाहून माझा उत्साह द्विगुणित झाला. ते माझे त्यावेळी मालक होते. आता खूप चांगले मित्र आहेत. मी गावी गेलो आणि गुर्‍हाळ सुरू केले. तेवढ्यात आणीबाणी लागली. माझे वडील आणीबाणी विरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे गुर्‍हाळाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली.

आमचे कुटुंब सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणारे. माझे वडील संघात सक्रिय होते. त्यामुळेच ते आणीबाणीवेळी आंदोलनात सहभागी झाले. सत्याग्रह आंदोलनात सक्रिय राहिल्याने ते गुर्‍हाळ संपेपर्यंत शेताकडे आलेच नाहीत.

मी चार महिन्यांनंतर पुन्हा वर्तक यांच्या वर्कशॉपमध्ये काम सुरू केले. त्यांनाही खूप बरे वाटले. मी त्यांच्यासोबत पुढे आठ-नऊ वर्षे काम केले. मोटर रिवाइंडिंगमध्ये माझे मोठे कौशल्य होते. 1982-83 मध्ये वर्तक यांच्या वर्कशॉपमधून बाहेर पडून, तिघांनी मिळून विठ्ठलवाडी येथे स्वतंत्र मोटर रिवाइंडिंग वर्कशॉप सुरू केला. साखर कारखान्यांवर जाऊन त्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी दुरुस्त करण्याचे काम सुरू केले.  पुढे 1985 ला मी माझा स्वत:चा वर्कशॉप हडपसर येथे सुरू केला. आम्ही तिघे पार्टनर विभक्त झालो, सर्वांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचे एकमताने ठरवूनच…

सप्लायर ते चेअरमन

श्रीगोंदा कारखान्याचे पहिले काम मला मिळाले, बोर्डे साहेबांमुळे. त्यांनी एक मोटर दोन दिवसांत भरून देण्यास सांगितली. माझ्यासमोर आव्हान होते. मात्र मी रात्रंदिवस काम करून दोनच दिवसांत श्रीगोंदा कारखान्याची मोटर भरून दिली, त्यामुळे बोर्डे साहेब खूश झाले आणि त्यांनी बक्षीस म्हणून मला दुप्पट रक्कम दिली. तेव्हापासून अनेक साखर कारखान्यांची कामे माझ्याकडे आली. श्रीगोंदासोबत, पाटस, सोमेश्वर, माळेगाव, जगदंबा इ. सगळ्या कारखान्यांवर मी जात असे आणि कामे करत असे.

मी पूर्वी सप्लायर म्हणून पुढे बसत होतो… आणि एक दिवस असा आला, की मी साखर कारखान्याचा चेअरमन बनून खुर्चीत बसलो आणि सप्लायर माझ्या समोर बसू लागले. मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

जनसेवा बँकेत संधी

1990 साली आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली. नामवंत जनसेवा बँकेवर माझी संचालक म्हणून निवड झाली. माझा व्यवसाय आणि जनसेवा बँकेचा संचालक म्हणून मी खूप काम केले. प्रचंड मेहनत घेतली. आयुष्यात चांगल्या घटनांची मालिका सुरूच राहिली. 1995 साली राज्यात युतीचे सरकार आले आणि त्याने ऊस झोनबंदीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आपल्या आवडीच्या कोणत्याही साखर कारखान्याला ऊस घालण्याचा मार्ग शेतकर्‍यांसाठी मोकळा झाला. मला वाटतं हा निर्णय क्रांतिकारी होता.

केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर, त्यांनी खासगी साखर कारखानदारीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. माझ्या दृष्टीने साखर उद्योग क्षेत्रासाठी हा दुसरा क्रांतिकारी निर्णय होता. या निर्णयाचा लाभ घेणारे पहिले व्यक्ती ठरले श्री. बी. बी. ठोंबरे. त्यांच्या नॅचरल शुगर या कारखान्याला मंजुरी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. पाठीशी असलेला प्रदीर्घ अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आदर्श साखर उद्योगाची उभारणी केली, त्यांचे मॉडेल आज खासगी साखर कारखानदारीसाठी पथदर्शक मानले जाते.

आणखी काही व्यक्तींना त्यावेळी खासगी साखर कारखान्याचे परवाने मिळाले होते. त्यात एक होते आमचे पाहुणे श्री. शिंदे. ते एकदा आमच्याकडे आले आणि जनसेवा बँकेने कारखाना उभारणीसाठी कर्ज द्यावे, अशी मागणी केली. पण या क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याचे आमचे धोरण नव्हते. त्यामुळे मी असमर्थता प्रकट केली.

असा उभा राहिला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना

2002 साली मी जनसेवा बँकेचा चेअरमन असताना, खासगी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव करून इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. संघ परिवाराचेही खासगी कारखाने उभे राहायला हवेत, असा संकल्प गडकरी, मुंडे आदी नेत्यांनी केला आणि त्या दिशेने पावले टाकली.

एकदा आमचे पाहुणे शिंदे पुन्हा माझ्याकडे आले आणि हा कारखाना तुम्हीच करा, असा आग्रह धरला. मी होकार दिला. कसलीही तयारी नव्हती. तरी मोठे आव्हान पेलण्याचा संकल्प सोडला. आमच्या मित्रमंडळीशी चर्चा केली. रासकर, गायकवाड, ससाणे, करपे, नाना, कदम अण्णा, शिंदे नाना, ढमढेरे आदी दहा-बारा जणांची बैठक झाली आणि प्रत्येकाने हातभार लावण्याचे ठरले. आणखी काही मित्र जमा झाले आणि आम्ही 25 – 30 जण एकत्र आलो. प्रत्येकाकडून पाच-पाच लाख रुपये जमा केले. त्यावेळी म्हणजे 2003 मध्ये दीड कोटीचे भांडवल उभ राहिले.

आमचे काही भांडवल आणि बँकांकडून काही घ्यायचे असे ठरवले आणि बँकांकडे गेलो. सर्वांना प्रस्ताव सादर केले. बँकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ठोंबरे यांच्या साखर कारखान्याचा कर्जाचा प्रस्ताव मी जनसेवा बँकेचा चेअरमन या नात्याने मंजूर केला होता. त्यामुळे आमच्या प्रस्तावाला इतर बँकांनी पाठिंबा दिला. मी बँकर असल्याने खाते एनपीएमध्ये जाऊ देणार नाही, याची खात्री बँकांना पटली होती.

अन्य बँकांकडून कर्ज मिळण्याच्या कामी विजयराव कुलकर्णी, वसंतराव देवधर अशा व्यक्तींची खूप मदत झाली. फायनान्सच्या बाबतीत कुलकर्णी आणि मशिनरीच्या बाबतीत ए. आर. पाटील यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. या दोघांबद्दल माझ्या खूप तीव्र भावना आहेत. दोघेही आज आपल्यात नाहीत, पण मी त्यांना देवाच्या स्थानी मानतो.

आम्ही जमा केलेले अडीच कोटी आणि शेतकर्‍यांकडून शेअरच्या रूपाने मिळालेली तेवढीच रक्कम असे एकूण आम्ही पाच कोटी जमा केले. उर्वरित रक्कम विविध बँकांनी कर्जरूपात दिली आणि 15 कोटींच्या गुंतवणुकीसह श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना 2002 साली उभा राहिला. आमचे स्वप्न पूर्ण झाले. संघाचे संस्कार, मुंडे-गडकरी आदी मंडळींची दूरदृष्टी अशा विविध घटकांमुळे पाटेठाण (ता. दौंड) येथे कारखाना उभा राहिला.

कारखाना उभा राहिला तेव्हा गाळप क्षमता होती अवघी हजार मे. टन. पहिल्या वर्षी फक्त दीडशे क्विंटल साखर उत्पादित केली. आमची चाचणी यशस्वी झाली. चाचणीवेळी आलेल्या सर्व अडचणींची यादी करून त्या पुढील संपूर्ण वर्षामध्ये दूर केल्या.

अशी झाली टीमची उभारणी

आमचे सध्याचे सीईओ डी.एम. रासकर त्यावेळी संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये होते. साईकृपालाही होते. त्यांच्या पाठीशी प्रदीर्घ अनुभव होता. ते आमच्याकडे रूजू झाले. ते सोडले तर इतर कारखान्यांतील दुसर्‍या फळीतील अधिकारी – कर्मचारी आमच्याकडे आले. इंदापूर कारखान्याचे शिंदे आमच्याकडे आले. त्यावेळी आमच्याकडे इतरांच्या तुलनेत पगारासाठी खूपच कमी पैसे होते. मात्र चांगले लोक मिळत गेले. रासकर यांनी तर सांगितले की, मला अर्धाच पगार द्या. कारखाना सुरू झाल्यानंतर उर्वरित पगार द्या. अशा प्रकारे सर्वांचा हातभार लागत गेला.

खासगी साखर कारखानाच का?

सहकारी साखर कारखान्याला परवानगी देणे बंद झाले होते. जयप्रकाश मुंदडा यांचा कारखाना आणि गोपीनाथराव मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना हे सहकारात परवानगी मिळालेले महाराष्ट्रातील शेवटचे कारखाने. मला वाटतं, खासगी क्षेत्रामध्ये सहकारापेक्षा अधिक जबाबदारी येते. कारण आपण खिशातील पैसे टाकलेले असतात. सहकारामध्ये दहा हजार रुपयांचा शेअर घेऊनही चेअरमन होता येते, तसे येथे नाही.

सहकारी तत्त्वावरील परवाने बंद होणे आणि खासगी सुरू होणे हा योगायोग होता. त्यातून आमचा खासगी कारखाना सुरू झाला.

आपण टाकलेल्या भांडवलाच्या मोबदल्यात चांगला परतावा तर मिळायलाच हवा. त्यासाठी शेतकर्‍यांना उत्तम भाव दिलाच पाहिजे. तरच तुम्हाला चांगला कच्चा माल, म्हणजे ऊस मिळेल. आम्ही भाग्यवान आहोत, कारण आमच्या भागात दोन नद्यांचा संगम आहे. त्यामुळे मुबलक ऊस आहे.

आमचा क्रशिंगचा आलेख दरवर्षी वाढतच गेला. अपवाद 2007 चा. त्यावर्षी दुष्काळाचा फटका बसला होता.

  आर्थिक शिस्त पाळली

आम्ही आर्थिक शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले. आजपर्यंत एकाही बँकेचा, एकही हप्ता थकू दिलेला नाही. त्यामागे आमचे काटेकोर नियोजन आहे. समजा आज सुमारे 75 रुपये हप्ता आहे आणि विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले आणि हप्ता 110 रूपये झाला. काही कारणामुळे एखादा हंगाम कारखान्याला चांगला गेला, नाही तरी 110 रुपयांचा हप्ता थकणार नाही, याची पुरेपूर काळजी आम्ही घेतली. टप्प्याटप्प्याने विस्तारीकरण करत गेलो, त्यामुळे आजपर्यंत कसलीही आर्थिक कोंडी निर्माण झाली नाही.

एक उदाहरण सांगू इच्छितो. आम्ही सीबीजी प्रकल्प सुरू केला. त्यासाठी 15 कोटींचे कर्ज उभारले. या प्रकल्पाचा डायजेस्टर फेल गेला. त्यामुळे सीबीजी उत्पादन सुरू होण्यास खूप विलंब झाला. मात्र आमचा बँकेचा हप्ता चुकला नाही. आमचे नियोजनच असे आहे. कोणत्याही अडचणीत बँकेचा हप्ता थकणार नाही, याची सर्वतोपरी काळजी आम्ही घेतो.

आजघडीला श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने अनेक आघाड्यांवर आदर्श निर्माण केले आहेत. त्यामुळे विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार पटकावले आहेत. आता हा उद्योग समूह बनला आहे. त्यात सहा कंपन्यांचा समावेश आहे. ‘श्रीनाथ’च्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत जाणार, याची खात्री आहे.

त्यांना उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »