छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे 1,272 सभासद अपात्र

कोल्हापूर : प्रादेशिक साखर सह संचालक (कोल्हापूर) यांनी छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या 1,272 सभासदांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत महाडिक गटाने माजी मंत्री सतेज पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता. ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याने फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी आता पाटील यांनी केली आहे.
सहसंचालकांनी गुरुवारी ( ७ सप्टेंबर) हा निकाल दिला. त्यामुळे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 सदस्यांसह 1,272 सदस्यांना अपात्र ठरले आहेत.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर विरोधक सतेज पाटील यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे एकूण 1,346 सभासदांना अपात्र ठरवण्यासाठी आणि साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मतदान करू न देण्याची तक्रार केली होती. मात्र चौकशीअंती प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी राज्याच्या तत्कालीन सहकारमंत्र्यांचा आदेश कायम ठेवला, ज्यांनी त्यांना मतदानासाठी पात्र ठरवले होते. सतेज पाटील गटाने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता उच्च न्यायालयानेही तोच आदेश कायम ठेवला. त्यानंतर झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारली होती.
नंतर, पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि हे प्रकरण फेर चौकशीसाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे परत पाठवले. सहसंचालकांनी फेरसुनावणी दरम्यान एकूण 1,346 सदस्यांपैकी 1,272 सदस्यांना अपात्र ठरवले.
यापूर्वीची निवडणूक बेकायदेशीर असल्याने आता राजाराम सहकारी साखर कारखान्याची फेरनिवडणूक घेण्याची मागणी पाटील यांनी केली.