राजाराम साखर निवडणूक: 29 उमेदवारांचे अपील फेटाळले

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अवैध अर्ज ठरलेल्या 29 उमेदवारांचे अपील प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी फेटाळून लावले. हा माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. त्यामुळे ते या निर्णयालाही आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी 25 एप्रिलला होणार आहे. पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवण्याने त्यांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे अपील केले होते.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आल्यानंतर आता विरोधी गट कोणती भूमिका घेणार याचीह उत्सुकता आहे. दुसरीकडे, निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी असणार आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून गुरुवार चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी महाडिक गटाला दिलासा दिला.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी कट्टर राजकीय वैर असलेल्या आमदार सतेज पाटील आणि महादेवराव हाडिक गटामध्ये थेट लढत होत आहे. कारखान्याची लढत थेट पाटील आणि महाडिक गटामध्ये होत असली, तरी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक सभासद असल्याने या दोन्ही तालुक्यातील आजी माजी आमदारांची भूमिकाही महत्वाची असणार आहे.
कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत पी. एन. पाटील गटाला धक्का बसल्याने राजाराम कारखान्यात ते महाडिकांसोबत ताकदीने राहतील अशी चिन्हे आहेत. आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे हे नेतेदेखील महाडिकांसोबत राहतील अशी शक्यता आहे.
सतेज पाटील यांना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी साथ दिली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.