राजाराम कारखान्यात भीषण आग

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने म्हटले आहे.
आग आटोक्यात आणण्यात तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली होती.
सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती. काही वेळातच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात तीन सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. दोनच दिवसापूर्वी राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
कारखान्यात अनेक ठिकाणी बगॅस पडले होते. काही ठिकाणी वेल्डिंगच्या साहाय्याने मशिनरी कट करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले व जमिनीवर पडलेल्या ऑइल व बगॅसने पेट घेतला.
राजाराम कारखान्यावर महाडिक गटाची सत्ता असून कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक अध्यक्ष आहेत.