‘राजाराम’चे कार्यकारी संचालक चिटणीस यांना बेदम मारहाण
कोल्हापुरात प्रकार; महाडिक–पाटील राजकीय संघर्षाला पुन्हा धार
कोल्हापूर : साखर कारखानदारीला कलंकित घडणारी घटना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी कसबा बावड्यात घडली. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एमडी) प्रकाश चिटणीस यांना जमावाने बेदम मारहाण केली.
यावरून सतेज पाटील – महाडिक गटांमधील राजकारण पेटले असून, कारखान्याकडून शेतकऱ्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने चिटणीस यांना मारहाण झाली असा आरोप पाटील यांनी केला आहे, तर यामागे माजीमंत्री सतेज पाटील यांचेच कारस्थान असून, त्यांनी फूस लावल्यामुळेच ही लाजिरवाणी घटना घडली, असा प्रत्यारोप अमल महाडिक यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या साखर उद्योग क्षेत्रातील ही पहिलीच घटना आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवण्यात आल्याचे अमल महाडिक यांनी सांगितले.
राजाराम कारखान्यात विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळीतासाठी जाणून-बुजून नेत नाहीत, ऊस नोंदी करत नाहीत, असा आरोप करत कसबा बावड्यातील शेतकऱ्यांनी चिटणीस यांना मुख्य रस्त्यावर पाटील गल्ली समोर गाडी आडवून बेदम बेदम मारहाण करण्यात आली.
नुकतीच राजाराम कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. तरीही कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. आता कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत.
मंगळवारी सकाळी काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात जाऊन आपल्यावर अन्याय होत असल्याबाबत निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी विनंती केली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही या निवेदनाची दखल घेत राजाराम कारखाना प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे.
दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोर शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. कार्यकारी संचालक यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी गाडीवरही हल्ला करण्यात आला, गाडीचा दरवाजा तोडण्यात आला.
सायंकाळची वेळ त्यातच गळीत हंगाम सुरू त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. दहा मिनिटे सुरू राहिलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी झाली. काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवले आणि त्यांची गाडी निघून गेली.