… तर कारखान्यांसमोर ढोल वाजवू : राजू शेट्टी

गत हंगामातील चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी २ ऑक्टोबरची मुदत
कोल्हापूर : मागच्या गळीत हंगामातील उसाचे प्रति टन ४०० रुपये कारखान्यांनी २ ऑक्टोबरपर्यंत द्यावेत; अन्यथा कारखान्यांची साखर अडवू. सर्व साखर कारखानादारांना जागे करण्यासाठी प्रत्येक कारखान्यासमोर ढोल वाजवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाला ४०० रुपये मिळावेत, यासह कारखान्यांनी ऑनलाईन वजनकाटे बसवावेत आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यानंतर झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते.
मार्केट यार्डात झालेल्या जाहीर सभेत शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांना गेल्या हंगामामध्ये गाळप झालेल्या साखरेस व उपपदार्थास चांगले दर मिळाले आहेत. यामुळे कारखान्याकडे अजूनही पैसे शिल्लक आहेत. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर कारखान्याने प्रतिटन ५०० रुपयांहून अधिकचा दुसरा हप्ता जमा केला आहे. मग कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देणे सहज शक्य आहे. त्यासाठी आम्ही २ ऑक्टोबर २०२३ ची मुदत देत आहोत. त्यापूर्वी शेतकऱ्यांचे सर्व पैसे जमा करावेत.
साखर कारखान्यांवर काटामारी होते, असा संशय आहे. त्यासाठी कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करा, अशी आमची मागणी आहे. यासाठी वैद्यमापनशास्त्र विभागाचे राज्याचे प्रमुख पोलिस महासंचालकांची भेट घेऊन चर्चा केली. जर पेट्रोलपंपांचे काम ऑनलाईन चालते, मग कारखान्यांच्या वजनकाट्याचे काम का चालत नाहीत? असा सवाल शेट्टी यांनी केला. वजन काटे ऑनलाईन व डिजिटल होत नाहीत, तोपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये; अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
सदाभाऊ खोत, तुम्ही आमच्या ढवळाढवळ करू नका. संघटनेच्या शिस्तभंग कमिटीवर आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार काय, असा सवाल करून यापुढे राजू शेट्टीवर जर बोललात तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सावकार मादनाईक यांनी यावेळी दिला.
प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, वाढती महागाई, गगनाला भिडलेली औषधे, बी-बियाणे व खतांचे दर यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मागील हंगामातील ४०० रुपये मिळालेच पाहिजेत, त्याशिवाय येत्या हंगामात उसाला ५ हजार दर मिळाला पाहिजे.
यावेळी जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, राजेंद्र गड्यानवार, राम शिंदे आदींचीही भाषणे झाली.