भीमाशंकर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत राडा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता.

कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली, सहकार मंत्री वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व सर्व संचालकांच्या उपस्थितीत सभा सुरू झाली.
व्यासपीठापुढे काही अंतरावर बॅरिकेड्‌स लावले होते. माजी अध्यक्ष देवदत्त निकम व त्यांचे समर्थक बॅरिकेड्‌सच्या आत येऊन बसले. त्यांनी बाहेर बसावे अशी मागणी अन्य ऊस उत्पादक सभासदांनी व वळसे पाटील समर्थकांनी जोरदारपणे केली. यानंतर निकम व त्यांचे समर्थकांनीही जोरदारपणे घोषणा दिल्या. वाढलेला गोंधळ पाहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निकम समर्थकांना बॅरिकेटसच्या बाहेर काढल्यानंतर गोंधळ थांबला. निकम मात्र मध्येच बसले होते.
निकम व्यासपीठाकडे जात असताना त्यांना सभासदांनी व कार्यकर्त्यांनी अडविले. तुम्ही संचालक आहात ही सभा सभासदांची आहे, तुम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत बोला, असे सांगून त्यांना व्यासपीठाकडे जाण्यापासून निलेश थोरात, मानसिंग पाचुंदकर, राजा बाबू थोरात यांच्यासह अनेकांनी रोखले. त्यानंतर पुन्हा मोठा गोंधळ झाला. निकम समर्थक यांच्याकडून मागणी केली जात होती निकम यांना व्यासपीठावर जाऊ द्या, त्यामुळे दहा मिनिटे गोंधळ सुरू होता. यावेळी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. निकम हे वळसे यांचे माजी विश्वासू असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.

विरोधकांकडून दिशाभूल
प्रास्ताविक बाळासाहेब बेंडे यांनी करून कारखान्याच्या प्रगतीचा अहवाल सादर करुन ते म्हणाले, राजकीय स्वार्थापोटी कारखान्याला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. शिरूर तालुक्यातील ३९ गावातील शेतकऱ्यांना भीमाशंकरचे सभासदत्व मिळावे म्हणून यापूर्वीच कारखान्याने ठराव मंजूर केला आहे. काही कारखान्यांनी विरोध केला असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे कायदेशीर अडचण आहे. परिणामतः कारखान्याची इच्छा असूनही ३९ गावातील शेतकऱ्यांना कायदेशीर अडचणीमुळे सभासदत्व देता येत नाही. ही वस्तुस्थिती माहित असूनही ऊस उत्पादकांमध्ये दिशाभूल केली जात आहे.

कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी विषय पत्रिकेवरील दहाविषय सभासदांपुढे मांडले. फक्त १० मिनिटातच आवाजी मतदानाने सर्व ठराव मंजूर करण्यात आले.

कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या आणि एकरी जादा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा रोख रक्कम देऊन दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

निकम यांचा आरोप
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत मला, सभासदांना व शेतकऱ्यांना बोलून द्यायचे नाही हे पाच सहा दिवस अगोदर ठरले होते. म्हणून जाणूनबुजून गोंधळ घातला. घोषणाबाजी केली. तसेच आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. शिरूरच्या एमआयडीसी मधून गुंड आणून सभेत गोंधळ घालण्यात आला. गोंधळ घालणारे सर्वजण मलिदा गँगवाले होते. मला स्टेजवर जावून दिले नाही. तसेच सभासदांना व शेतकऱ्यांना बालून दिले. दडपशाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली, असा आरोप देवदत्त निकम यांनी केला.
तर वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून चांगला चालत असलेल्या कारखान्यात विरोधक विनाकारण राजकारण आणत आहे. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी म्हटले आहे. आढळराव यांनीही निकम यांच्यावर टीका केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »