इथेनॉलप्रश्नी तोडगा निघण्याची आशा : संजय खताळ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊस रस/शुगर सिरपपासून होतो ५८ टक्के इथेनॉल पुरवठा

पुणे : उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल उत्पादन करण्यावर या हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी साखर उद्योगाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवहार्य तोडगा काढणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे (महाशुगरफेड) व्यवस्थापकीय संचालक आणि माजी आयएएस अधिकारी संजय खताळ यांनी व्यक्त केली.

‘शुगरटुडे’ शी बोलताना ते म्हणाले, ‘‘सरकारने साखर क्षेत्रासाठी अप्रिय निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे पायावर धोंडा पडल्यासारखी स्थिती निर्माण होणार नाही अशी आम्हाला आशा आहे. यातून मार्ग काढता येऊ शकतो. बी आणि सी मोलॅसेसपासून इथेनॉल उत्पादन करण्याबाबत कसलेही निर्बंध नाहीत. हे इथेनॉल उत्पादन होईलच आणि त्याची नेहमीप्रमाणे खरेदी होईलच.’’

मागच्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, असे लक्षात येईल की साखर उद्योगाकडून उसाचा रस आणि शुगर सिरपपासून उत्पादित इथेनॉलचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या अंदाजे ५८ टक्के होते. तर बी हेवी आणि सी हेवी मोलॅसेसपासून बनणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण अनुक्रमे अंदाजे ३५ ते ३७ टक्के आणि २ ते ३ टक्के होते. सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी यंदाच्या सर्व ऑफर्सचा आदर राखला जाईल, अशी हमी दिली आहे. त्यामुळे फार काळजी करण्याचे कारण नाही. यंदा उसाचा रस आणि शुगर सिरपपासून इथेनॉल पुरवठा होणारच नाही, त्यामुळे त्याचे बी आणि सी साठी समायोजन करावे, अशी आता आमची मागणी राहील, असे संजय खताळ यांनी सांगितले.

हा पर्याय केंद्र सरकार नक्की स्वीकारेल, कारण त्यात त्यांना कसलीही अडचण नाही, असा विश्वासही खताळ यांनी व्यक्त केला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »