थकित एफआरपीप्रश्नी सात कारखान्यांना गाळप परवाना नाही
साखर आयुक्त ; कारखान्यांना निधी भरण्यासाठी मुदतवाढ
पुणे : राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. थकित एफआरपी असणाऱ्या राज्यातील ७ साखर कारखान्यांना ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी स्पष्ट केले. राज्यात सहकारी १०७ व खासगी १०७ मिळून २१४ साखर कारखान्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ऊसगाळप परवाना प्रस्ताव सादर केले आहेत. दरम्यान, कारखान्यांना ऊसगाळपावर आधारित विविध निधी भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
२८ साखर कारखान्यांना गाळप परवाना
राज्यातील साखर गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने नुकताच घेतला होता. त्यानुसार हंगामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी साखर आयुक्तालयाने २८ कारखान्यांना गाळपाची परवानगी दिली आहे तर ३३ कारखान्यांच्या परवान्याची तपासणी आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.






