ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ, पुण्यात पवार-पंकजा मुंडे बैठक
पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघाला आहे. तसेच मुकादमांचे कमिशन एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे.
पुण्यातील साखर संकुल मध्ये साखर कामगार आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. अपेक्षित दरवाढ न दिल्यास कोयताबंद आंदोलनाचा इशारा ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी दिला होता. २५ डिसेंबरपासून राज्याच्या काही भागात कोयता बंद आंदोलन सुरू झाले होते. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन ऊसतोड कामगारांना देण्यात आले होते.
ऊसतोड कामगारांना सध्या २७४ रुपये प्रति टन मजुरी दिली जाते. त्यात ३४ टक्के दरवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना चालू हंगामापासून ३६६ रुपये प्रति टन इतकी मजुरी मिळणार आहे. दरम्यान मुकादम यांच्या कमिशनमध्ये देखील एक टक्क्याची वाढ करण्यात आली असून त्यांना मजुरीच्या २० टक्के कमिशन देण्यात येणार आहे.
राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर महासंघाचे संचालक जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आदी बैठकीसाठी उपस्थित होते.
दरम्यान, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे काम अपेक्षित गतीने पुढे जात नाहीये. त्याबद्दल आपण असमाधानी असल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भात आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही त्यांनी पुण्यात दिला.