कर्तृत्ववान अधिकारी गेला : शेखर गायकवाड

पुणे : श्री. अरविंद रेड्डी यांचे निधन झाले, ही बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या आहेत. एक कर्तृत्ववान अधिकारी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत निवृत्त साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. गायकवाड यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, गेल्या चार-पाच वर्षात अनेक वेळेला भेटी होत असत. मी त्यांना आठवणीने बदललेले साखर संकुल पहायला बोलावले होते; कारण साखर संकुल त्यांच्या कार्यकाळात बांधण्यात आले होते. एक अत्यंत कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ते ओळखले जात. अतिशय मोकळा स्वभाव, दिलखुलास व्यक्तिमत्व.
मैत्री जपण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या स्वभावातच होती. शासनातील अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विशेषतः माजी मुख्यमंत्री स्व. अ. र. अंतुले यांच्या कारकीर्दीत त्यांचे स्वीय सहायक असताना, अनेकांना मदत केल्याबद्दलच्या आठवणी आहेत. एक वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यातून ते नुकतेच सावरले होते. आता त्यांच्या निधनामुळे या कुटुंबीयांवर हा दुर्दैवी आघात झाला आहे.
परमेश्वराने या दुःखातून सावरण्याची शक्ती रेड्डी कुटुंबियांना द्यावी, ही प्रार्थना. .ईश्वराने रेड्डीच्या आत्म्यास चिरंतन शांती द्यावी, असेही श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे.