मृत व्यक्तीचे मुखत्यारपत्र

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून सहज भरार्या मारतात, त्यांचे खुमासदार सदर ‘प्रशासकीय रंगढंग’ खास ‘शुगरटुडे’च्या वाचकांसाठी…
एका शहरात हरीशेठ नावाचा एक व्यापारी राहत होता. हरीशेठ ने शहरालगत असलेल्या एका लहान गावात जमीन खरेदी करण्याचे ठरविले. हरीशेठ ने गावातील बर्याच लोकांना जमीन कशी पाहिजे व खरेदी करण्याबाबत विचारणा केली.
हरीशेठला गावात जमीन खरेदी – विक्री करणारे दोन मध्यस्थी करणार्या व्यक्ती भेटल्या. त्या दोन मध्यस्थ व्यक्तींनी हरीशेठला गावामध्ये स्वस्तात चांगली जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आठ दिवसानंतर जमीन खरेदी-विक्री करणार्या त्या दोन लोकांनी हरीशेठला जमिनीची कागदपत्रे दाखविली. ते दोघेही त्या जमिनीचे मालक नव्हते. मालकसदरी एका दुसर्या व्यक्तीचे नाव होते.
हरीशेठने जमिनीची कागदपत्रे पाहिल्यावर जमीन मालकासोबत जमीन खरेदी करण्याबाबत कधी चर्चा करायची असे त्या दोघांना विचारले. त्यावर त्या दोघांनी हरीशेठला असे सांगितले की, ‘आमच्याकडे जमीन मालकाचे मुखत्यारपत्र आहे. त्यामुळे आम्हीच तुम्हाला खरेदीखत करुन देऊ. आम्हीच या जमिनीचे मालक आहोत आणि आम्हीच सह्या करणारे!, असे सांगून त्या दोन मध्यस्थांनी मुखत्यारपत्राची झेरॉक्स प्रत हरीशेठला दिली. तसेच व्यवहार करुन देण्याची खात्री पण दिली.
हरीशेठने त्या जमिनीची खात्री करण्यासाठी ही कागदपत्रे गावातील अनेक लोकांना व एका वकिलाला दाखविली. त्यामध्ये त्याला ही जमीन खरेदी करण्यात कोणतीही अडचण नाही असे हरीशेठला सांगितले. त्यानंतर हरीशेठने पाच-सहा दिवसानंतर सर्व पैसे देऊन जमिनीचे खरेदीखत करुन घेतले. खरेदी खताप्रमाणे ७/१२ वर जेव्हा नाव लावण्यासाठी तलाठी कार्यालयात फेरफार नोंद धरण्यात आली, तेव्हा तलाठ्याने सर्वांना नोटीस काढली.
हरीशेठच्या एक बाब नव्यानेच लक्षात आली आणि ती म्हणजे, ज्या व्यक्तीचे मुखत्यारपत्र या दोन मध्यस्थ व्यक्तींनी दिले होते ती मूळ व्यक्ती सहा महिन्यांपूर्वीच मयत झाली होती. फेरफार नोंदीची नोटीस ‘व्यक्ती मयत’ असा शेरा पोष्टाकडून टाकून परत आली.
गावातील कुणालाही ती व्यक्ती मयत झाल्याची कल्पना नव्हती. फक्त त्या दोन मध्यस्थांना ती व्यक्ती मयत झाल्याची माहिती होती. त्या दोघांना हे सगळे माहीत असताना सुद्धा त्यांनी पैसे घेऊन व्यापारी हरीशेठ याची घोर फसवणूक केली होती. सांगायचे तात्पर्य म्हणजे मूळ मालक मयत झाला की, मयत व्यक्तीने करुन दिलेल्या मुखत्यारपत्राला कायद्यात काहीही अर्थ राहत नाही! बघता बघता हरीशेठ एका गुन्हेगारी प्रकरणात गुंतण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
नैतिकतेने चूक, पण कायद्याने बरोबर!
एका गावात गणेश नावाचा एक तरुण त्याच्या आई-वडिलांबरोबर राहात होता. गणेशला त्याच्या मेहनतीमुळे पदवीधर झाल्याबरोबर काही दिवसांनंतर हवाईदलात एका पदावर अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. हवाईदलात रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच त्याने त्याच्या एका हवाईदलातीलच मैत्रिणीसोबत प्रेमविवाह करण्याचे ठरविले.
गणेशच्या लग्नाला त्याचे आई-वडील व सर्व नातेवाईकसुद्धा आले होते. गणेशच्या आई-वडिलांना मात्र नवीन सुनेच्या घरच्या लोकांची कोणाचीच ओळख नव्हती. गणेशचा विवाह सोहळा अतिशय आनंदात पार पडला. काही दिवसांनंतर गणेश त्याच्या कामावर रुजू झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर गणेशचा आसाममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये अचानक दुर्दैवी मृत्यू झाला.
गणेशच्या आई-वडिलांवर तर जणू आभाळ कोसळल्यासारखे झाले होते. गणेशची पत्नी केवळ एका महिन्यातच विधवा झाली होती.
तिच्यावर तर जणू कुर्हाडच कोसळली होती. गणेशच्या मृत्यूचे सगळे विधी पार पडल्यानंतर गणेशच्या आई-वडिलांनी सुनेला आणि तिच्या आई-वडिलांना सांगितले, की आमची सून आम्हाला मुलीसारखी आहे, आम्ही तिला वार्यावर सोडणार नाही.
शिवाय तिचे पुन्हा लग्न लावून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. पण सुनेचे आई-वडील गणेशच्या आई-वडिलांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते तिला माहेरी घेऊन गेले. दु:खात असल्यामुळे कोणीच काही बोलले नाही.
काही दिवसांनी सुनेच्या आई-वडिलांनी तिला सांगितले, ‘हे बघ! तुझे हित कशात आहे ते आम्हाला जास्त कळते. गणेशच्या हवाईदलाची सर्व पेन्शन, इन्शुरन्सची सर्व रक्कम तर आपल्याला मिळालीच पाहिजे.’
माहितीचा कायदा वापरून मी तुझा नवरा म्हणजे गणेशची काय काय प्रॉपर्टीहोती ते शोधून काढतो. तू दुसरे लग्न न करता काही दिवस असेच काढ. तसेही तुझे लग्न होऊन एकच महिना झालाय. शिवाय तुला मूल ना बाळ! सगळ्या प्रॉपर्टी मध्ये तुला हिस्सा मिळाल्यावर आपण दुसरा मुलगा शोधून तुझे लग्न करू.
गणेशच्या पत्नीने तिच्या आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तर केलेच, पण तिने कागदावर लग्न न करता, एका मुलाबरोबर अनधिकृतरीत्या राहून आयुष्यभर सासू-सासर्यांना छळत राहण्याचा सुद्धा कार्यक्रम केला.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे कलियुगाची लक्षणे आता प्रॉपर्टीच्या संबंधात पदोपदी आढळून येतात. कधी कधी नैतिकदृष्ट्या पूर्ण चूक, पण कायद्याप्रमाणे १०० टक्के बरोबर वागण्याचा माणसे प्रयत्न करताना दिसतात.





