… तर पुढील हंगाम रोखणार : शेतकरी संघटना

पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी एफआरपी काढताना ९ टक्के पायाभूत उतारा पकडून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, अन्यथा हंगाम सुरू होऊ देणार नाही. ४ सप्टेंबरपासून आसूड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना दिलेल्या निवेदनात वरील मागणी केली आहे. केंद्र सरकारने सन २०२४- २५ साठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी उसाला प्रतिटन ३ हजार ४०० रुपये दर जाहीर केला आहे, तो ऊस उत्पादकांवर अन्यायकारक आहे. मूळ उतारा ९ टक्के करून प्रतिटनास ३ हजार ६५० रुपये दर द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे..
साखरेची किमान विक्री किंमत ४००० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात यावी, केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीचा कायदा लागू करावा, कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, कृषी किंमत न्यायाधिकरणाची व शेतीविषयक कामांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करावी इ. मागण्याही शेतकरी संघटनेने केल्या आहेत.