श्रीनाथ म्हस्कोबा करणार सात लाख टन गाळप

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे, अंदाजे सात लाख मे. टन ऊस गाळप होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी केले.
पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २०२४-२०२५ गळीत हंगामातील मिल रोलर पूजन आणि मशिनरीचे पूजन कारखान्याचे कर्मचारी विजयसिंह शेळके आणि त्यांच्या पत्नी प्रमिला शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. राऊत बोलत होते.
ऊस गळीत हंगाम २०२४-२५ साठी कारखान्याकडे १० हजार २०० हेक्टर क्षेत्र ऊसलागवडीची नोंद झाली आहे. कारखान्यास अंदाजे ७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार असून, कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी कारखान्याने टायर बैलगाडी ४००, ट्रॅक्टर टायरगाडी ३५०, वाहन टोळ्या २२५, हार्वेस्टर ५ अशा पद्धतीने ऊसतोडणी यंत्रणा उभारणीसाठी करार केले आहेत, अशी माहिती देऊन ‘ऊस लागवडीच्या नोंदी मोबाईल अॅपद्वारे सुरू आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी कारखान्याकडे वेळेवर ऊस नोंदी कराव्यात,’ असे आवाहन राऊत यांनी केले.
या वेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, संचालक महेश करपे, अनिल बधे, माधव राऊत, किसन शिंदे, भगवान मेमाणे, लक्ष्मण कदम, चंद्रकांत कदम आणि कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.