सिद्धराम सालिमठ नवे साखर आयुक्त

मुंबई : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांची शासनाने नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉ. कुणाल खेमनार यांची जागा घेतील. आतापर्यंतचे सर्वांत तरुण साखर आयुक्त ठरलेले डॉ. खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
श्री. सालिमठ हे राज्याच्या प्रशासनातील अनुभवी अधिकारी असून, २०११ च्या त्यांना आयएएस श्रेणीत पदोन्नती मिळाली.
यापूर्वी त्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकी संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. सिद्धराम सालीमठ यांनी कृषी संशोधन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. १९९५ पासून ते प्रशासकीय सेवेत आहेत. मागील सुमारे ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत त्यांनी महसूल, शहरी विकास, जमीन अधिग्रहण या विषयांवर मोठय़ा प्रमाणात काम केले आहे. सिडकोत येण्याआधी ते पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
जव्हार, कणकवली, सावंतवाडी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सिधुंदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली जिल्ह्याचे जमीन अधिग्रहण अधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, यूएलसी मुंबई चे सक्षम प्राधिकारी, उपसचिव नागरी विकास विभाग, ओएसडी टू एसीएस महसूल, कोकण विभागीय महसूल विभागाचे उप आयुक्त या विविध पदांवर काम केले आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम ठोसपणे राबविले. विशेषतः कोविड काळात सालीमठ यांनी पालघरच्या ग्रामीण भागांतील लोकांमध्ये जनजागृतीसाठी अनेक उपक्रम सुरू केले. सुपोषण उद्यान, रान मेवा स्पर्धा, संपूर्ण स्वस्थ आहार याविषयीचे महोत्सव सिद्धराम सालीमठ यांनी सुरू केले.
नगर विकास विभागात उपसचिव म्हणून काम करताना त्यांनी मुंबई मेट्रो रेल 3, मुंबई मेट्रो रेल 7, पुणे मेट्रो रेल, नागपूर मेट्रो रेलचे महत्वकांक्षी प्रकल्प यशश्वीपणे हाताळले आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळसंबंधी प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. विमानतळ प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची कॅबिनेट नोट बनविण्यात सालीमठ यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. सिडकोमध्ये असताना नवी मुंबई विमानतळ प्रकल्पास गती देण्याचे काम त्यांनी केले.
याशिवाय IAS सिद्धाराम सालीमठ यांनी सिडको, एमएमआरडीए हाताळत असलेल्या न्हावा शेवा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, एमयूटीपी, एमआरव्हीसी, उन्नत रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांमधील समस्याही हाताळल्या आहेत.
येथील दोन वर्षांच्या सेवेनंतर त्यांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या काळात त्यांनी नगरचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली.
‘शुगरटुडे’च्या वतीने नव्या साखर आयुक्तांना खूप खूप शुभेच्छा!