‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अखेर बळी गेला!

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद बळावला आणि पुढे राजकीय वळणे घेत, अखेर चिमणीचा बळी गेला. चिमणी तर जमिनीवर आली, आता विमाने कधी उडणार याची प्रतीक्षा राहणार आहे. या साऱ्या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याचा किंवा नवा उपाय शोधण्याचा मनापासून प्रयत्न झालाच नाही, हे दुर्दैवी आहे.
सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर ठरविलेली श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी गुरूवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आली. सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक कडेकोट पोलिस बंदोबस्तात या चिमणीचे पाडकाम करण्यात आले..
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरली म्हणून ही ९२ मीटर उंचीची चिमणी पाडून टाकण्याची मागणी पुढे आली होती. तर महापालिकेनेही या चिमणीचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून कारवाई हाती घेतली होती. या चिमणीच्या आडून राजकारण खेळण्यात आले आहे.
चिमणी वाचविण्यासाठी शेवटपर्यंत झालेले कारखाना आणि सर्व हितचिंतकांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने सिध्देश्वर साखर कारखान्याला ४५ दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली होती..
चिमणी पाडण्याच्या कामासाठी बुधवारी पहाटेपासून कारखाना परिसर सील करण्यात आला होता. गुरुवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास चिमणी पाडली गेली. तत्पूर्वी पोलिसांनी कारखान्याचा परिसर ताब्यात घेतला होता. तब्बल २१०० पोलिस कर्मचारी तैनात केले होते.
चिमणी वाचविण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्यासह सभासद शेतकऱ्यांनी धावपळ केली, आंदोलने उभारली होती.
जाहीर निषेध….
दरम्यान, कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी, समाजमाध्यमात सविस्तर व्यक्त होत चिमणी पाडण्याच्या कृतीचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की,
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे बॉयलरची चिमणी आज अखेर जमीनदोस्त झाली. ज्या दळभद्री विचाराच्या मानसिकतेला याचा असुरी आनंद घ्यावयाचा आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन…..
चिमणी वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झगडणारे सिद्धेश्वर चे कामगार ,कर्मचारी सभासद ,संचालक मंडळ आणि अर्थातच धर्मराज काडादी या सर्वांचे मी अभिनंदन करतो…
आज फक्त चिमणी पडली नाही तर इथला कामगार देशोधडीला लागला आहे .त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे मोठे विधायक काम झाले आहे . फक्त सोलापूरकरांचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या असुरी आणि घातकी कृत्याकडे लागून राहिले आहे .जे कोणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष या कृत्यांमध्ये सहभागी आहेत त्यांना त्यांची फळे लवकरच मिळतील…
सोलापूरकर आता अशाच पद्धतीने दहा दिवसा आड होणारा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याकरिता धडाडी प्रशासनाच्या पुढच्या वाटचालीकडे आस लावून बसले आहेत.
सोलापूर शहरात शेकडो बेकायदेशीर इमारती बिल्डिंग, चाळी ,मंगल कार्यालय एक ना अनेक दिमाखात उभ्या आहेत. त्याबाबत ही प्रशासनाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
एखादी संस्था उभारण्यास तिला नावारूपास आणण्यास काय कष्ट करावे लागतात, हे माहित असते तर आजचे हे कृत्य कोणीही केले नसते. वैयक्तिक द्वेषा ऐवजी सिद्धेश्वर कारखान्यावर प्रत्यक्ष दीड हजार तर अप्रत्यक्ष दहा हजार कर्मचारी आणि तीस हजार सभासदांचे कुटुंबीय अवलंबित आहेत, शहराच्या विमानसेवेपेक्षा त्यांचे प्रपंच जास्त महत्त्वाचे होते.
चिमणी पाडल्याने साखर कारखाना चालूच राहील तो बंद पडणार नाही, असे म्हणणाऱ्या तज्ञ मंडळींचेही हार्दिक अभिनंदन….
शहरात आता विमानसेवा चालू होणार, नक्कीच चालू होणार, कधी ते विचारू नका… याचा प्रत्यय आपणास लवकरच येईल हेही लक्षात ठेवा.
कारखान्यातील सर्व कामगार कर्मचारी यांना मी एकच सल्ला देईन, मित्रांनो शांत रहा संयमी रहा. जगातल्या प्रत्येक संकटाला उत्तर हे असतेच .आपण लवकरच या अडचणीतून बाहेर निघू आणि पुन्हा नक्की भरारी घेऊ… आपल्यावर कोसळलेल्या या दुःखात महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्व कामगार कर्मचारी सहभागी आहेत.