… तर ‘साखर आयुक्तालय’ नावाची पाटी फोडणार : पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ‘साखर आयुक्तालया’चे नाव बदलून ‘ऊस भवन’ किंवा ‘ऊस आयुक्तालय’ करण्याची मागणी आम्ही केली आहे, त्याची पूर्तता न झाल्यास सध्याची ‘साखर संकुल’ ही पाटी फोडून टाकणार आणि तेथे नवी पाटी बसवणार, अशा इशारा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे संघटनेने दिला आहे.

पाटील यांच्या नेतृत्वाखाली, संघटनेचे शिष्टमंडळ साखर आयुक्तांना भेटले. त्यानंतर ‘शुगरटुडे’ने पाटील यांची भेट घेऊन, त्यांची भूमिका जाणून घेतली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पैशाच्या जोरावर ही भव्य इमारत (साखर आयुक्तालय) उभी राहिली आहे. आजही या इमारतीसाठी शेतकऱ्यांच्या उसाच्या देय रकमेतून प्रति टन रक्कम कापून घेतली जाते. मात्र येथे शेतकऱ्यांना काय स्थान आहे?

या इमारतीत महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाचे कार्यालय आहे, तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचेही (व्हीएसआय) मोठे ऑफिस आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. मात्र साखर कारखानदारांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे जागा देण्यात येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. या दोन्ही कार्यालयांचा येथे काय संबंध आहे? हे दोन्ही कार्यालये आम्ही या इमारतीतून हाकलून देणार आहोत, असा सज्जड इशाराही पाटील यांनी दिला.

काही झालं तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कापण्यात येतात. ‘व्हीएसआय’साठी शेतकऱ्यांचे पैसे आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळासाठी देखील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वापरले जातात. ही कपात आता बंद करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे पाटील म्हणाले.

‘साखर आयुक्तालय’ शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभे राहिले असल्याने, त्याला साखर आयुक्तालयाऐवजी ‘ऊस भवन’ वा ‘ऊस आयुक्तालय’ नाव द्यावे, यासाठी आम्ही १ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही ‘साखर संकुल’ बोर्ड तोडून नवा बोर्ड लावणार आहेत, असे पाटील म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »