नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत

मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली आहे. अनेकदा साखरेला ‘विष’ म्हणून हिणवले जाते, मात्र रुजुता दिवेकर या विचाराला आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की, जीवनशैलीतील अनियमितता आणि ताणतणाव हे आरोग्यासाठी खरे धोके आहेत, साखर नाही.
दिवेकर या करिना कपूरसह अनेक बॉलीवूड कलावंतांच्या आहार सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी साखरेबद्दल मते मांडली आणि तो व्हिडिओ चांगलाच व्हायरला झाला आहे.

त्यांनी विशेषतः पारंपरिक भारतीय साखरेचे प्रकार, जसे की गुळ (jaggery) आणि खांडसरी, यांना चुकीच्या पद्धतीने ‘वाईट अन्न’ म्हणून वर्गीकृत केले जात आहे, असे म्हटले आहे. रुजुता दिवेकर पारंपरिक भारतीय साखरेला आपल्या आहारात स्थान देण्यास प्रोत्साहन देतात आणि साखरेचे पूर्णपणे सेवन थांबवण्याऐवजी तिला समजून घेण्याचा, आदर करण्याचा आणि आपल्या आजी-आजोबांप्रमाणे पारंपरिक पद्धतीने खाण्याचा सल्ला देतात.
येथे रुजुता दिवेकर यांनी साखरेसंबंधी दिलेले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे आपल्यासाठी दिलासादायक ठरू शकतात:
- स्थानिक आणि हंगामी मिठाई खा: आयात केलेल्या स्नॅक्सऐवजी स्थानिक, हंगामी फळे आणि पारंपरिक भारतीय मिठाई खावी. उन्हाळ्यात आंबे आणि हिवाळ्यात तिळाचे लाडू खाण्यास प्रोत्साहन दिले आहे.
- सण उत्सव मिठाईसोबत साजरे करा, अपराधी भावना न ठेवता: सणावाराचे पदार्थ आत्म्याला पोषण देण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी असतात. केवळ डायटिंगच्या ट्रेंडसाठी दिवाळी किंवा ईदमध्ये मिठाई खाणे टाळणे म्हणजे आपल्या अन्नसंस्कृतीपासून दूर होणे आहे.
- रिकाम्या पोटी नव्हे, जेवणासोबत साखर खा: रुजुता यांच्या मते, साखरेचे सेवन जेवणासोबत केल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे (blood sugar spikes) टाळता येते आणि ऊर्जेची पातळी स्थिर राहते. दुपारच्या जेवणानंतर गुळाचा छोटा तुकडा खाण्याची परंपरा याच कारणामुळे आहे.
- रिफाईंड साखरेऐवजी गुळाचा वापर करा: गूळ हा खनिज-समृद्ध आणि अपरिष्कृत (unrefined) साखर आहे, ज्याचा वापर भारतीय घरांमध्ये शतकानुशतके केला जात आहे. तो केवळ गोडच नाही, तर पचनास मदत करतो, हार्मोन्स संतुलित ठेवतो आणि शरीराला उष्णता देतो. हिवाळ्यात गुळाचे लाडू आवश्यक आहेत, आणि गुळाचा तुकडा थंडीपासून बचाव करण्यास मदत करतो.
- पॅकेज्ड मिठाई टाळा, घरगुती पदार्थांकडे परत फिरा: रुजुता प्रक्रिया केलेल्या (processed) साखरयुक्त पदार्थांऐवजी घरगुती मिठाईंना प्राधान्य देतात. खीर, मुगाच्या डाळीचा हलवा आणि घरगुती भारतीय मिठाईंना ‘होय’ म्हणा.
एकूणच, साखर हे ‘राक्षस’ नाही, तर प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ, अनियमित जेवण आणि ताणतणाव हे खरे धोके आहेत. कमी खाण्याऐवजी योग्य खाण्यावर भर द्या. त्यामुळे, कोणी तुम्हाला तूप लावलेले लाडू फेकून देण्यास सांगितले, तर तुम्हाला काय करायचे आहे हे माहित आहे, असे दिवेकर म्हणाल्या.