देशात साखर उत्पादन घटल्याने यंदा मोठी दरवाढ शक्य

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून यंदा दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वर्तविली आहे. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातही उत्पादनावर याचा परिणाम दिसून आला आहे. राज्यात साखर उत्पादन हे तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. मागील आर्थिक वर्षातील देशातील २९० लाख मेट्रिक टनाच्या तुलनेत यंदा २४१ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. या हंगामात ५३३ साखर कारखान्यांपैकी ३८० कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी ५३४ कारखान्यांपैकी केवळ २४० कारखाने बंद झाले होते. साखरेचे उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगून ते म्हणाले की,  ‘उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला फटका बसला आहे.

राज्यात ८३८ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, मागील हंगामात झालेल्या १०३० लाख मेट्रिक टनापेक्षा ते १८.६५ टक्क्यांनी कमी आहे. ७९.२० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले असून, ते मागील वर्षीच्या १०५ लाख मेट्रिक टनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २०० पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षी ही संख्या केवळ १०३ होती. ‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख टन झाले असून, ते मागील वर्षी ८७६ लाख टन होते. मागील वर्षी ९२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, यंदा ८४ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख मेट्रिक टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने एस ग्रेड साखरेची किंमत ३७८० ते ३८३० रुपये प्रतिक्विंटल आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »