गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक येत्या मंगळवारी वा बुधवारी होणार असून, यंदाचा गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘शुगरटुडे’शी बोलताना १ नोव्हेंबरच्या मुर्हूताला दुजोरा देतानाच, अंतिम निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत होणार असल्याचे सांगितले.
पावसाअभावी राज्यातील ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाअभावी उसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढविलेली क्षमता यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम कसा-बसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते आणि 2022-23 हंगामात राज्यातील कारखान्यांनी 10.5 दशलक्ष टन उत्पादन केले होते. मात्र यंदा ऊस आणि साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA) ने साखर कारखान्यांना उसाचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता गृहीत धरून 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. WISMA ने म्हटले आहे कि, यंदा उत्पादनात 15 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारू शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो.
महाराष्ट्रात दरवर्षी गळीत हंगाम १५ ऑक्टोबरच्या आसपास सुरू होतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. गत हंगामापेक्षा उसाची उपलब्धता १५ ते २० टक्क्यांनी कमी आहे. शिवाय उसाची वाढ म्हणावी तशी झालेली नाही, ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊसही कारखान्यांत येईल. परिणामी शेतकऱ्यांचे, तसेच उतारा कमी आल्याने कारखान्यांचेही नुकसान होईल, असाही मतप्रवाह आहे.
दरम्यान, ताज्या माहितीनुसार मंत्रिसमितीची बैठक बुधवारी, १७ रोजी मंत्रालयात होत असून, त्यासाठी साखर आयुक्तालयाने केलेल्या सविस्तर प्रस्तावात गाळप हंगामासाठी १ नोव्हेंबरचीच शिफारस केली आहे.