गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासूनच

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : २०२३-२४ चा ऊस गळीत हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीने हा निर्णय घेतला.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ऊस गाळप हंगामासाठीची मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. आगामी हंगामाच्या तयारीबाबत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सादरीकरण केले. साखर संचालक (प्रशासन) डॉ. संजयकुमार भोसले, संचालक (वित्त) यशवंत गिरी, श्री. सुरवसे, सहसंचालक मंगेश तिटकारे हे देखील उपस्थित होते.

गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते आणि १०५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने, १४.०७ लाख हेक्टर ऊस क्षेत्र एकूण गाळपासाठी उपलब्ध होणार असून, साखर उत्पादन ८८.५८ लाख मे. टन एवढे होण्याचा अंदाज यावेळी वर्तविण्यात आला. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. यंदा विक्रमी २१७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले आहेत.

ऊस तोड कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला ही रक्कम वेळेत देण्याचा यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी समग्र एफआरपी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

mumbai sugar meeting

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खानदेशातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनाला फटका बसला आहे. राज्यात यंदा 14 लाख 7 हजार हेक्टरवर ऊस लागवड असून, त्यातून 1 हजार 22 लाख टन ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यातील 90 टक्के ऊस गाळपास आल्यास एकूण 921 लाख टन ऊस प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध असणार आहे. त्यातून 103.58 लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे.

इथेनॉलकरिता 15 लाख टन साखर वळविल्यास व संभाव्य निव्वळ साखर उतारा दहा टक्के गृहीत धरल्यास राज्यात यंदा 88.58 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »